मडगाव : पुढारी वृत्तसेवा
२०२७ मध्ये कॉंग्रेस पक्षच सत्तेत येऊन गोव्याला गतवैभव प्राप्त करून देईल. गोव्याचे पर्यावरण, डोंगर, म्हादई नदी आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
नाया बांध, पावरा बांध, नायगुइलो बांध आणि भुईसा बांध येथे के. टी. गेट्स बसविण्याच्या कामाचा तसेच शाह सोडा फॅक्टरीजवळील डेमाणी येथे व उर्दू शाळेमागील डेमाणी परिसरात नाल्याच्या सुधारणा व आर.सी.सी. भिंती बांधण्याच्या कामाचाही प्रारंभआलेमाव यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुंकळ्ळी नगराध्यक्ष लॅन्ड्री मास्कारेन्हास व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, साबरकोट्टोव व्हेरोडा नाल्याचा गाळ सुमारे १५ वर्षांनंतर काढण्यात येत आहे.
गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात नदीकाठावरील परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या कामामुळे भविष्यात पूरस्थिती टाळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने नेहमीच जनतेच्या भावनांचा आदर केला आहे. लोकांच्या विरोधानंतर निर्णय मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. सध्या सरकारकडून लोकांवर प्रकल्प लादले जात असल्याचे ते म्हणाले.