मडगाव : पुढारी वृत्तसेवा
नावेली-रातवाडो परिसरात गृहनिर्माण प्रकल्पाचा वाद थेट प्रशासनाच्या दारातपर्यंत पोहोचला आहे. पंचायतीने दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासत या प्रकल्पाला परवानगी मंजूर केल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी आदर्श देसाई यांची भेट घेत वादग्रस्त गृहनिर्माण प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविला.
प्रतिमा कुतिन्ही यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीने संबंधित जागेची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान सरपंच पॉल परेरा आणि स्थानिक पंच सदस्या ब्रागांझा उपस्थित होत्या. त्यावेळी अरुंद रस्ता आणि सखल भागातील जमीन या मुद्द्यांवर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवत प्रकल्पाला विरोध दर्शविला होता.
ग्रामस्थांच्या विरोधाची दखल घेत पंचायतीने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला पत्र देत या प्रकल्पास परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले होते. तसेच कुतिन्हो म्हणाल्या, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खाते, गटविकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र, आदर्श देसाई यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली असता त्यांना कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पंचायतीने ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. नगर नियोजन आणि इतर सरकारी विभागांनाही पत्र पाठविल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ग्रामस्थांनी स्वतः चौकशी केली असता संबंधित विभागांना असे कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे उघड झाले.
त्यामुळे पंचायतीच्या भूमिकेवर संशय अधिकच गडद झाला आहे. या प्रकल्पास मान्यता द्यावी की नाही यावर चर्चा करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी विशेष बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीस सरपंच आणि संबंधित बांधकाम व्यावसायिक गैरहजर राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बांधकाम व्यावसायिकाला अनेक उल्लंघनांनंतरही परवाना कसा देण्यात आला, याबाबत ग्रामस्थांनी थेट जाब विचारला. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या सभेत 'या प्रकल्पाला कोणताही परवाना दिला जाणार नाही' अशी हमी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच परवाना मंजूर झाल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र ...
अन्यथा आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, पंचायतीने राजकारण थांबवावे. हा प्रकल्प उभा राहिल्यास भविष्यात स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागेल. सरपंच आणि स्थानिक पंचांना हा प्रकल्प थांबवता येत नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशाराही दिला आहे.