पणजी : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीसाठी एक स्पष्ट दिशा मिळाली आहे. अमेरिकेशी केलेल्या व्यापारी करारामध्ये राष्ट्रीय होत असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले. तानावडे यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना वरील प्रतिपादन केले.
तानावडे पुढे म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारने निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमांची स्पष्ट रूपरेषा मांडण्यात आली आहे. तानावडे यांनी युरोपियन आणि अमेरिकेसोबत महत्त्वाचे व्यापार करार यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
ते म्हणाले की, हे करार जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची वाढती ताकद आणि विश्वासार्हता दर्शवतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, भारताने असे व्यापारी करार केले आहेत जे राष्ट्रीय हिताचे रक्षण करतात, त्याचबरोबर भारतीय व्यवसाय आणि निर्यातदारांसाठी नवीन संधी निर्माण करतात.
भारत-युरोपियन युनियन कराराचा संदर्भ देत तानावडे म्हणाले की, ७० टक्क्यांहून अधिक टेरिफ लाईन्सवरील शुल्क तत्काळ काढून टाकले जाईल, ज्यात भारताच्या एकूण निर्यात मूल्याच्या सुमारे ९०.७ टक्के वस्तूंचा समावेश आहे.
पुढील तीन ते पाच वर्षांत सागरी उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांसह आणखी २० टक्के उत्पादनांवरील शुल्क टप्प्याटप्प्याने कमी केले जाईल. यामुळे भारतीय निर्यातीला मोठी चालना मिळेल आणि मेक इन इंडिया उपक्रमाला आणखी पाठिंबा मिळेल, असे तानावडे म्हणाले.
अर्थव्यवस्थेच्या मजबुतीकरणाकडे लक्ष...
अमेरिकेशी झालेल्या व्यापाराबद्दल ते म्हणाले की, अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या भारतीय वस्तूंवरील शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. हे भारताच्या विकासगाथेवर प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांचा वाढता विश्वास आणि आत्मविश्वास दर्शवते, असे सांगून भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि देशासाठी दीर्घकालीन विकास व रोजगाराच्या संधी सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल तानावडे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले.