MLA Michael Lobo criticized the government
आमदार मायकल लोबो Pudhari File Photo
गोवा

सरकारी कर्मचार्‍यांची भ्रष्टाचाराची परिसीमा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विरोधी आमदार जेवढी लक्तरे काढणार नाहीत, त्यापेक्षाही जास्त टीका सत्ताधारी आमदार मायकल लोबो यांनी सरकारवर केली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली विकासाची स्वप्ने धुळीस मिळवण्यास नोकरशाही पेटून उठली आहे. सरकारी कर्मचार्‍यांनी भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. तेच सरकारला बदनाम करीत आहेत. त्यांच्यावर कोणाचा वचकही राहिलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः चांगली व्यक्ती आहे. मात्र, सरकारच्या या गलथान कारभारावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलेच पाहिजे, असे सांगत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केले.

अर्थसंकल्पावर चर्चा करताना आमदार मायकल लोबो यांनी सरकारला हा ‘घरचा आहेर’ दिला. मायकल लोबो म्हणाले, एका बाजूने भ्रष्टाचार करून सरकारी कर्मचारी व अधिकारी सरकारच्या बदनामीला कारणीभूत ठरत आहेत. दुसर्‍या बाजूने पोलिस महासंचालक पदावरील अधिकार्‍याची हकालपट्टी करण्याची वेळ आली. आसगावप्रकरणी जो गोंधळ झाला तो आपल्याला आवडलेला नाही. त्यावर गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे, असे ते म्हणाले. आमदार लोबो म्हणाले, सरकार पोलिसांना वेळेवर वेतन देते. परंतु, पोलिस आपले कर्तव्य पार पाडत नाहीत. राज्यात चोर्‍या, खून प्रकरणे वाढली असताना पोलिस निष्क्रिय झाले आहेत. खाण व्यवसाय सुरू करण्यात आलेले अपयश, पर्यटन व्यावसायाकडे झालेले दुर्लक्ष, वाढते अपघात, रस्त्यांची दुर्दशा आदी विषय त्यांनी उपस्थित केले.

कला अकादमीकडे सरकारचे दुर्लक्ष

कला अकादमीच्या दुरुस्तीकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे चांगले अभिनेता आहेत. मात्र, कला अकादमीकडे लक्ष द्यायला त्यांना जमले नाही. कला अकादमीत बसविलेली ध्वनीयंत्रणा पूर्णपणे खराब आहे. कार्यक्रमासाठी बाहेरून ध्वनीयंत्रणा व्यवस्था करावी लागते, हे सरकारचे अपयश आहे. आपण एका कार्यक्रमाला कला अकादमीत गेलो होतो. तेथे ध्वनी व्यवस्था करण्यासाठी आपल्याला 80 हजार रुपये त्या गटाला द्यावे लागले. ते पैसे सरकारने आपल्याला परत करावे, अशी मागणी आमदार लोबो यांनी केली.

आयआयटीची पायाभरणी कधी?

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक घराला शौचालये बांधून देण्यात आली आहेत. हे काम 100 टक्के झाल्याचा दावा सरकार करीत आहे. त्यावर सरकारने पुन्हा एकदा विचार करावा. कारण हा केवळ दावा आहे. प्रत्यक्षात वेगळे चित्र आहे, अशी टीका लोबो यांनी केली. प्रत्येकाला आयआयटी नको, मात्र, युवकांसाठी आयआयटीचा प्रकल्प महत्त्वाचा आहे. राज्यात आयआयटी केव्हा सुरू होणार? त्याची पायाभरणी कुठे होणार, यावर सरकारने उत्तर द्यावे असेही ते म्हणाले.

स्थानिक टॅक्सीवाल्यांना अभय हवे

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे टॅक्सीवाल्यांवर बोलले ते आपल्या जिव्हारी लागले आहे. त्यांनी तसे बोलायला नको होते, असा मुद्दा लोबो यांनी मांडला. टॅक्सी प्रकरण हाताळण्यात सरकार अपयशी झाल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील टॅक्सी व्यावसायिक हे गोमंतकीय असून, त्यांनी दागदागिने गहाण ठेवून वाहने खरेदी केली आहेत. या व्यवसायात उतरलेले गोमंतकीय युवक संकटात सापडले आहेत. त्याचे कारण म्हणजे हॉटेलमधील पर्यटकांचे भाडे भलताच कुणीतरी घेऊन जातो, असे प्रकार घडत आहेत. किनारी भागातील युवक यामध्ये अधिक भरडले जात आहेत. त्यामुळे सरकारने स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना अभय देण्याची गरज असल्याचे लोबो म्हणाले.

आता तरी डोळे उघडा

मायकल लोबो हे सत्ताधारी आमदार आहेत. ते तुमच्या घरचे आहेत. त्यांनी तुमच्या डोळ्यांत अंजन घातले. किमान आता तरी डोळे उघडा, असा टोला आमदार कार्लुस फरेरा यांनी हाणला. राज्यात अपघात वाढले, चोर्‍या, खून, दरोडे वाढले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली, असे सत्ताधारी आमदारच सांगत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सांगितले. यावेळी आपण बघून घेतो, अशी टिपणी मुख्यमंत्र्यांनी केली.

SCROLL FOR NEXT