वाळपई : पुढारी वृत्तसेवा
दाबोस पाणी प्रकल्पाच्या अवघ्याच अंतरावर असलेल्या मासोर्डे सत्तरी येथील गावात गेल्या चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. वाळपई पाणीपुरवठा खाते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ग्रामस्थांत संतापची लाट पसरलेली आहे.
महिलांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून दोन दिवसांत समस्या न सुटल्यास वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. स्थानिक आमदार विश्वजिीत राणे यांनी या संदर्भात गांभीयाने लक्ष द्यावे, अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे.
दाबोस पाणी प्रकल्पापासून अवघ्याच अंतरावर मासोर्डे गाव आहे. या गावात गेल्या चार दिवसांपासून नळ कोरडे पडलेली आहेत. नळाला पाणी येत नाही, त्यामुळे ग्रामस्थांची बऱ्याच प्रमाणात गैरसोय झालेली आहे.
अनेकवेळा या गावातील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा कार्यालयाशी संपर्क साधून निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याची मागणी केली. मात्र, ही समस्या अजूनही दूर झालेली नाही.
या संदर्भात निष्काळजीपणा करण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांत पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्यातरी संतप्त ग्रामस्थ व महिलांनी तीव्र स्वरूपाची भावना व्यक्त करत पुढील दोन दिवसांत ही समस्या दूर न झाल्यास वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
असमाधानकारक उत्तरे
ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून नळाला पाणी येणे बंद झाले. संध्याकाळपर्यंत नळाला पाणी येणार अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून तीच स्थिती राहिली. अनेकवेळा या संदर्भात खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे मिळाले, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
आरोग्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या संदर्भात विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केलेली आहे. या गावात अनेकवेळा पिण्याच्या पाण्याचे टंचाई निर्माण होत असते. कायमस्वरूपी उपाययोजना करून या गावात पूर्णवेळ पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करा, अशी मागणी ग्रामस्थांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे केली आहे.