मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या १० महिन्यांत लाखो प्रवाशांना पकडत तब्बल २२.८१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण ९,४९५ विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या कालावधीत ४.१३ लाखांहून अधिक प्रवासी विनातिकीट अथवा नियमांचे उल्लंघन करताना आढळले.
या सर्व कारवायांतून रेल्वेने २२.८१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. केवळ जानेवारी २०२६ या एका महिन्यातच १,०१४ विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये ४४,७३६ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले. त्यांच्याकडून भाडे आणि दंडाच्या स्वरूपात सुमारे २.५३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.
कोकण रेल्वे मार्ग हा पर्यटन आणि प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या परिस्थितीचा फायदा घेत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रेल्वे प्रशासनाने आता स्थानकांवर, धावत्या गाड्यांमध्ये तपासणी अधिक कडक केली आहे.
मोहीम यापुढेही अधिक तीव्र होईल
रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण आणि शिस्तबद्ध प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.