वास्को : पुढारी वृत्तसेवा
कुठ्ठाळी मतदारसंघातील केळशी ग्रामपंचायतीच्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने हे केंद्र 'सुविधा केंद्र' की 'असुविधा केंद्र', असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. या प्रकाराला नेमके कोण जबाबदार आहे, याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून, वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात हे केंद्रच कचऱ्याच्या राशींमध्ये गाडले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
केळशी ग्रामपंचायतीतून संकलित होणाऱ्या कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी वेर्णा औद्योगिक वसाहतीमागील केसव्हाळ येथे एमआरएफ केंद्र उभारण्यात आले आहे. पंचायत क्षेत्रातील कचरा या केंद्रात आणला जातो. मात्र, तेथे कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया नियमितपणे होत आहे की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, त्यातील काही कचरा जाळण्यात आल्याचाही दावा काही नागरिकांनी केला आहे. केंद्राच्या परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत असून, त्याचे योग्य वर्गीकरण केले जात नसल्याचे एकंदर परिस्थितीवरून स्पष्ट होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची सरपंच आणि पंच सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कंत्राटदाराकडून कचऱ्यावर प्रक्रिया का होत नाही, याची माहिती घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. एमआरएफ केंद्र वस्तीपासून काहीसे दूर असल्याने तेथील परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे केंद्र परिसरात साचणाऱ्या कचऱ्याच्या राशींकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दूषित पाणी जमिनीत झिरपणार
सध्या पावसाळा सुरू असल्याने साचलेला कचरा कुजून त्यातील दूषित पाणी जमिनीत झिरपण्याची शक्यता असून त्यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. एमआरएफ केंद्रातील यंत्रणा व्यवस्थित कार्यरत नसल्यास कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.