पणजी : पुढारी वृत्तसेवा
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी १०० एआय कॅमेरे राज्यभरात लावले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गेल्या काही वर्षांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
यातून अपघातांचे आणि अपघातात बळी किंवा जखमी होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सरकार, पोलिस आणि वाहतूक विभाग प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यात १०० एआय कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावर्षीपासून गोवा डिजिटल टॅक्सी धोरण राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच पीपीपी तत्त्वाखाली ७४५ कोटी रुपये खर्चुन म्हापसा, मडगाव व वास्कोतील बस टर्मिनलचा पुनर्विकास करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
राज्यात वाहनांच्या तपासणीसाठी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स यंत्रणा उभारली जाईल, तसेच माझी बस योजना चालूच ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कदंबच्या १३७ बसेस खरेदी करणार
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी २५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कदंब महामंडळासाठी १३७ बसगाड्या खरेदी करणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.