पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात पावसाला उशीर झाला किंवा उष्णतेत वाढ झाली तरीही शाळा ६ जूनपासूनच सुरू होतील. जर उष्णता वाढली तर शालेय वर्ग वेळेपूर्वी सोडण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. पहिली, दुसरी, तिसरी पाचवी व अकरावीचे वर्ग ६ जूनपासून सुरू होणार आहेत, तर इतर इयत्तेचे वर्ग एप्रिलमध्येच सुरू झाले आहेत.
शैक्षणिक वर्ष आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती ४० ते ५० टक्के अपेक्षित आहे. सोमवारपासून सुमारे २० टक्के विद्यार्थी वर्गात रूजू होतील.
काही परप्रांतीय विद्यार्थी आणखी दोन आठवडे उशिरा शालेय हजेरी लावण्याची शक्यता आहे, असे झिंगडे म्हणाले. बहुतेक सरकारी शाळांची डागडुजीची कामे पूर्ण होत आली आहेत. १०० टक्के कामे पूर्ण झाली असे सांगू शकत नाही.
एप्रिलमध्ये शाळा सुरू असल्याने शाळांची कामे वर्ग सुरू असताना बंद ठेवण्यात आली होती. मे महिन्यात ही कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यार्थ्यांना गणवे-शाचे ५०० रु. व रेनकोटचे ६०० रु. मिळून एकूण ११०० रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जे नवीन विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत त्यांच्या पालकांना बँक खाती शाळांना देण्यास सांगण्यात आली आहेत.