पणजी : पुढारी वृत्तसेवा
आरजीचे पक्षाध्यक्ष मनोज परब यांच्या अधिकृत राजीनाम्यानंतर आता सोशल मीडियावर मनोज परब यांना पुन्हा पक्षात आणा' अशी मागणी जोर धरू लागली आहे. कार्यकर्त्यांपासून समर्थकांपर्यंत अनेकजण पक्षाच्या मूळ नेतृत्वाच्या पुनरागमनाची उघडपणे मागणी करताना दिसत आहेत.
मनोज परब गोव्यात प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर उभ्या राहिलेल्या आरजीसमोर आता सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षाची एकजूट टिकवणे, मनोज परब यांच्या पुनरागमनाची शक्यता, नव्या नेतृत्वाची मांडणी किंवा पक्षातील मोठी फूट या तिन्ही शक्यतांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
गोव्याच्या प्रादेशिक राजकारणात आक्रमक भूमिका घेऊन उदयास आलेल्या आरजीमध्ये सध्या अभूतपूर्व अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून, पक्षाच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शनिवारी या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध झालेल्या पत्रकाने राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडवली.
पक्षाच्या सीईसीच्या १७ मे रोजी झालेल्या बैठकीत सर्व विद्यमान ब्लॉक समित्या तत्काळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या ब्लॉक समित्या लवकरच स्थापन केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निर्णय केवळ संघटनात्मक फेरबदल नसून पक्षातील वाढत्या अंतर्गत नाराजीचे संकेत मानले जात आहेत.
ज्युलियस आल्मेडा यांच्या जातीयवादी पोस्ट
पक्षाच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर ज्युलियस आल्मेडा यांनी केलेल्या जातीयवादी फेसबुक पोस्ट शेअर करण्यात आल्या. प्रत्येक गोमंतकीयाने या पोस्ट वाचणे गरजेचे असून आरजीपी केंद्रीय कार्यकारिणी समिती योग्य होती की अयोग्य हे आता जनतेने ठरवायचे, असे सांगण्यात आले.