https://youtu.be/aBe5LLjQN-c?si=yxy1H4f598XSc-awपणजी : राज्यातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीचा थेट परिणाम आता हॉटेल व्यवसायावर दिसून येत आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळपास एक हजार रुपयांची वाढ झाल्याने गोव्यातील अनेक हॉटेल आणि खानावळींनी खाद्यपदार्थाच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. परिणामी, गोव्यात सुट्टीसाठी येणाऱ्या मध्यमवर्गीय पर्यटकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला हॉटेल व्यावसायिकांनी केवळ चहाचे दर वाढवले होते. मात्र पुन्हा गॅसचे दर वाढल्याने इतर पदार्थांचे दरही आता हळूहळू वाढवण्यात येत आहेत. हॉटेल व्यावसायिकांच्या मते, गेल्या महिन्याभरात गॅस सिलिंडरचे दर झपाट्याने वाढले असून त्याचा थेट परिणाम खाद्यपदार्थाच्या उत्पादन खर्चावर झाला आहे. केवळ गॅसच नव्हे, तर भाज्या, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय चालवणे अधिक खर्चिक बनले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव खाद्यपदार्थांचे दर वाढवावे लागत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
पणजीतील एका हॉटेल मालक शिवराम शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याच्या तुलनेत आमच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. आधी १९ किलो गॅस सिलिंडरची २१५० रुपये होती. मात्र, ती किंमत वाढून ३१५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गॅस महागल्यामुळे स्वयंपाकाचा खर्च वाढला असून काही पदार्थांच्या किंमती १० ते २० टक्क्यांनी वाढवाव्या लागल्या आहेत.
दरम्यान, वाढत्या दरांमुळे पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होताना दिसत असला तरी अनेक पर्यटक वाढीव दर असूनही गोव्यातील खाद्यसंस्कृतीचा आनंद घेत आहेत. मात्र, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटवर याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांच्या मते, जर गॅस दरवाढ अशीच कायम राहिली, तर आगामी पर्यटन हंगामात पर्यटकांच्या खर्चाच्या सवयींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे छोट्या हॉटेल्स आणि स्थानिक खानावळींसमोर आर्थिक आव्हान निर्माण होऊ शकते.
गोव्यात बहुतांश पर्यटक हे गोवन खाद्यपदार्थ चाखण्यासाठी येतात. मात्र, किनारी भागातील पदार्थांचे दर वाढल्याने देशी पर्यटक नाराज होताना दिसत आहेत.- हॉटेल मालक
आम्ही दरवर्षी गोव्यात एक छोटी फॅमिली ट्रीप करतो. मात्र यंदा खाद्यपदार्थांचे दर वाढल्याने आमच्या खिशाला कात्री लागली असून, दरवर्षीच्या तुलनेत आम्हाला लवकर घरी जावे लागले.- अक्षय कदम, पर्यटक, पुणे