पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून मंगळवारी दिवसभर जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते तुंबले, झाडे कोसळून वाहनांचे व मालमत्तेचे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. हवामान खात्याने दि. २५ रोजीपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील चार दिवसांत मुसळधार पावसासह ताशी ४० ते ५० कि. मी. वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर जोर धरला. पावसासोबत वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. सत्तरी बार्देश, फोंडा, डिचोली, तिसवाडी, सांगे, काणकोण, वास्कोसह अन्य भागांत झाडे कोसळणे आणि नुकसानाच्या घटना घडल्या. रस्त्यांवर तसेच घरांवर झाडे पडल्याने काही ठिकाणी वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.
सुदैवाने संध्याकाळपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नव्हते. वास्कोसह काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. झाडे कोसळल्याने रस्ते बंद झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. वीज विभाग आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दिवसभर दुरुस्ती व बचाव कार्यात व्यस्त होते. दरम्यान, गेल्या २४ तासांत काणकोण येथे ७.५५ इंच पावसाची नोंद झाली.
म्हापसा येथे ५.१६ इंच, केपे ५.११ इंच, सांगे ४.७३ इंच, मडगाव ४.३८ इंच आणि पेडणे येथे ३.५५ इंच पाऊस नोंदवण्यात आला. १ ते २३ जून या कालावधीत राज्यात सरासरी १३.८८ इंच पावसाची नोंद झाली असून, मंगळवारी झालेल्या पावसामुळे सरासरी तूट सुमारे १२ टक्क्यांनी भरून निघाली आहे. तरीही एकूण पर्जन्यमान अद्याप ५८.८ टक्क्यांनी कमी आहे. पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने किनारपट्टी भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिल्याने नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.
झाड कोसळल्याने कारचे नुकसान
माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मंगळवारी दुपारी धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा, या मागणीसाठी धनगर बांधवांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटण्यासाठी आल्तिन्हो, पणजी येथील सरकारी निवासस्थानी गेले होते. याचवेळी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील एक मोठे झाड मुळासकट कोसळले. या झाडाखाली कवळेकर यांची इलेक्ट्रिक कार तसेच इतर काही वाहने अडकली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले.