पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा आंतरराष्ट्रीय हे पर्यटनाचे राज्य आहे. प्रतिवर्षी सुमारे एक कोटी पर्यटक गोव्यात येतात. त्यामुळे पर्यटकांचे हित सांभाळतानाच गोव्यातील पर्यटक टॅक्सी चालकांनाही न्याय देणे सरकारचे कर्तव्य आहे.
टॅक्सी अॅग्रीग्रेटर अॅपला काही टॅक्सीचालक वारंवार विरोध करत आहेत. त्यामुळे आता सरकारने डिजिटल टॅक्सी अॅपसाठी धोरण तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अॅग्रीग्रेटर अॅप आपोआप रद्द होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत दिले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला पहिलाच प्रश्न हा टॅक्सीच्या विषयी विचारला होता. ते म्हणाले की, गोव्यातील टॅक्सी चालकांवर सरकार वारंवार अन्याय करत आहे. त्यांना अॅपध्ये सहभागी व्हा, मीटर बसवा अशी जबरदस्ती केली जाते. टॅक्सी व्यवसायावर सरकारचे नियंत्रण नाही.
अॅग्रीग्रेटर अॅपला मोठ्या प्रमाणात टॅक्सी चालकांचा विरोध असतानाही सरकार त्याची जबरदस्ती करत आहे. सरकारने अॅग्रीग्रेटर अॅप रद्द करावे, अशी मागणी आलेमाव यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, टॅक्सी चालकांशी संवाद साधून टॅक्सीच्या विषयावर तोडगा काढला जात आहे.
चार दिवसांपूर्वी आयोजित बैठकीत बहुतांश टॅक्सीचालकांनी नव्या डिजिटल टॅक्सी अॅपला होकार दिला आहे. त्यामुळे ज्यावेळी नवे डिजिटल टॅक्सी अॅपची अंमलबजावणी सुरू होईल, त्यावेळी पूर्वीचे अॅग्रीग्रेटर अॅप आपोआप रद्द होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यात सगळे बरे, पण...
वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, टॅक्सी व्यवसाय सुरळीत व्हावा यासाठी सरकार विविध पर्याय टॅक्सी चालकांना देत आहे. मात्र, काहीजण त्या पर्यायाला विरोध करतात. गोव्यात सर्वकाही चांगले आहे.
मात्र, टॅक्सी व्यावसायिक जास्त पैसे आकारता. ते तेवढे सुधारा, अशी मागणी पर्यटक करीत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव सर्वत्र होत असताना टॅक्सी व्यवसाय त्यापासून दूर राहू शकत नसल्याचे गुदिन्हो म्हणाले.