पणजी : गोव्यात २०२५ वर्षात सायबर गुन्ह्यांच्या नोंदणीत तब्बल ६५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. २०२४ मध्ये ८५ प्रकरणे नोंदली गेली होती, तर २०२५ मध्ये ती वाढून १३१ प्रकरणांवर पोहोचली. गेल्या तीन वर्षांत एकूण २९८ सायबर गुन्हे नोंदवले गेले असून त्यापैकी केवळ १७ प्रकरणांत पैसे परत मिळवण्यात यश आले आहे.
पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, गुन्हेगार बनावट अॅप्स व गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करतात. अनेक वेळा मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जाते. आतापर्यंत गोवा पोलिसांनी ४४२ वेब लिंक, १६८ सोशल मीडिया खाती, ८६६ मोबाईल क्रमांक ब्लॉक केले आहेत. सायबर फसवणुकीमुळे गोव्यातील १०० कोटी रुपयांचा फटका बसल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. ही केवळ अधिकृत आकडेवारी असून नागरिकांना सुमारे प्रत्यक्ष नुकसान अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. १०३ सायबर गुन्ह्यांची प्रकरणे सहा महिन्यांहून अधिक काळ तपासाधीन आहेत. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगार परदेशातून कार्यरत असल्याने त्यांना पकडणे कठीण ठरत आहे.
जनजागृती आणि उपाययोजना
गोवा पोलिस विविध मोहिमा राबवून नागरिकांना जागरूक करत आहेत. तसेच शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. वरिष्ठ नागरिकांना विशेषतः अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तपासकाम दर कमी
पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार, मागील पाच वर्षांत नोंदवलेल्या सायबर गुन्ह्यांपैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणे अद्याप उघडकीस आलेली नाहीत. या कालावधीत ४४१ प्रकरणे नोंदली गेली असून त्यापैकी फक्त १७० प्रकरणांचा तपास लागलेला आहे.