पणजी : पुढारी वृत्तसेवा
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तत्काळ माझ्याविरोधात सुरू झालेल्या वैयक्तिक टीका, समन्वित हल्ले आणि प्रायोजित प्रचार मोहिमांमुळे भाजप सरकारची अस्वस्थता आणि भीती असल्याचे उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
चोडणकर म्हणाले की, माझ्यावर अचानक सुरू झालेल्या नियोजित हल्ल्यांमुळे आणि प्रायोजित अपप्रचारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, गोव्यात काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन आणि संघटनात्मबळकटीकरण भाजपला अस्वस्थ करीत आहे. एकसंघ, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारी काँग्रेस ही भाजपच्या अहंकारी, दिशाभूल करणाऱ्या आणि अपयशी कारभारासाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकते, याची त्यांना जाणीव झाली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या व्यक्तींमार्फत करण्यात येणारे हे छुपे हल्ले आपल्याला ना विचलित करू शकत, ना घाबरवू शकतात, असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले. चोडणकर म्हणाले, या हल्ल्यांमुळे मी कमकुवत होत नाही. उलट माझा निर्धार अधिक मजबूत होतो. माझी बदनामी करण्याचा प्रत्येक प्रयत्न गोव्याच्या जनतेसाठी लढण्याची आणि भाजप सरकारच्या अपयशांचा पर्दाफाश करण्याची माझी बांधिलकी अधिक दृढ करतो.
प्रचारबाजी नव्हे, तर सुशासनाची गरज चोडणकर म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या सरकारने ट्रोल्स आणि राजकीय एजंट्सचे व्यवस्थापन करण्यात वेळ घालवण्याऐवजी जनतेच्या रास्त प्रश्नांची उत्तरे देण्यावर भर द्यावा. गोव्याला प्रचारबाजी नव्हे, तर सुशासनाची गरज आहे. रोजगार, वीज, आरोग्य सेवा, शिक्षण, कायदा व सुव्यवस्था आणि गोव्याच्या संसाधनांची सुरू असलेली निर्बंधहीन विक्रीबाबत जनता प्रश्न विचारत आहे.
प्रॉक्सी वॉरियर्स'ची फौज तैनात
चोडणकर म्हणाले की, वाढती बेरोजगारी, ढासळती पायाभूत सुविधा, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, भ्रष्टाचाराचे आरोप, पर्यावरणाची केली जाणारी हानी आणि सामान्य गोमंतकीयांवर वाढत चाललेला आर्थिक भार यासारख्या गंभीर प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी भाजप सरकारने आपल्या राजकीय विरोधकांवर हल्ले करण्यासाठी 'प्रॉक्सी वॉरियर्स'ची फौज तैनात केली आहे.