Sal River Pollution  Pudhari File Photo
गोवा

Sal River | केळशीत शेकडो खारफुटींची कत्तल

Sal River | हॉटेलच्या विस्तारीकरणासाठी राजकीय आशीर्वादामुळे कृत्य केल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

केळशी येथील एका हॉटेल व्यावसायिकाने मासेमारीसाठी समुद्रावर जाणाऱ्या मच्छीमारांच्या पारंपरिक मार्गावर टाइल्स बसवल्याचा प्रकार ताजा असताना आता केळशी येथील साळ नदीला लागून असलेल्या पाणथळ भागातील शेकडो खारफुटींची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नदीच्या काठावरील कत्तल करण्यात आलेली खारफुटी शेकडो वर्षे जुनी असून मोठ्या वृक्षासमान आकार घेतलेल्या या खारफुटीच्या झाडांची कत्तल कोणी व का केली, हे गुलदस्त्यात आहे. प्राप्त माहितीप्रमाणे बऱ्याच दिवसांपासून खारफुटी कापून टाकण्याचा प्रकार सुरू होता. मात्र त्याविषयी कोणालाही माहिती मिळाली नाही. केळशी येथील शेल्टन फर्नांडिस यांनी या प्रकाराला वाचा फोडली आहे.

शेल्टन यांनी दिलेल्या माहितीनुसार, साळ नदीच्या काठावर असलेल्या केळशीच्या पाणथळ भागात लाखो खारफुटी कापून टाकण्यात आल्या आहेत. यात काही राजकारण्यांची नावे समोर येत असून त्यांच्याच आशीर्वादाने एका हॉटेलच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता ही कृती केल्याचे कळते. निवडणुकीला अवघेच काही महिने शिल्लक आहेत. आचारसंहिता लागू झाल्यास नेत्यांचे वशिले चालणार नाहीत, याची कल्पना असल्यामुळे एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हा विध्वंस करण्यात आलेला आहे, अशी जोरदार चर्चा या भागात सुरू आहे.

शेल्टन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह होडी घेऊन केळशीला लागून असलेल्या साळ नदीच्या किनारपट्टी भागाची पाहणी केली असता शेकडो चौरस मीटर परिसरात एकही खारफुटी दिसणार नाही अशा पद्धतीने खारफुटींची कत्तल करण्यात आल्याचे त्यांना दिसून आले. याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. पुरावे मिळू नये यासाठी काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खारफुटी मुळापासून उखडून काढण्यात आली आहे. खारफुटीच्या मोठ्या फांद्या नदीत टाकण्यात आल्याचेही ते म्हणाले. स्थानिक संतान परेरा यांनी पुढारीशी बोलताना या विध्वंसाचा परिणाम गावाला भोगावा लागणार आहे, असे सांगितले. ढासळत चाललेली किनारपट्टी वाचवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून खारफुटीची झाडे करत आहेत. संपूर्ण जगाला तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. समुद्राने भरती रेषा ओलांडली असून किनाऱ्यांची धूप झाल्यामुळे समुद्राचे पाणी आता लोकवस्तीपर्यंत येऊन पोहोचले आहे. अशा परिस्थितीत खारफुटीचे जतन करण्याच्या ऐवजी कत्तल केल्यामुळे भविष्यात समुद्राचे पाणी गावात येणार हे निश्चित असल्याचे ते म्हणाले.

अनेक पक्ष्यांचे होते वास्तव्य...

हा पाणथळ भाग जैवविविधतेने नटलेला होता. अनेक प्रकारचे पक्षी या पाणथळ भागात पाहायला मिळत होते. मोठमोठ्या मगरींच्या वास्तव्यासाठी देखील साळ नदीजवळचा हा भाग अतिशय प्रसिद्ध होता. आता तिथे खारफुटींची कत्तल होत असताना पंचायत तसेच सीआरझेड प्राधिकरणाला माहिती मिळाली नसल्याच्या प्रकारामुळे त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT