हरमल : दरवर्षीच्या पावसाचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी असल्याने कित्येक जणांनी चिंता व्यक्त केली. मात्र अधिक चिंतातूर शेतकरी असून लावलेला तरवा वाढला नसल्याने सगळी मेहनत पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया शेतकरी तुकाराम कोरगावकर यांनी दिली.
यंदाच्या शेती हंगामात दरवर्षी प्रमाणे शेतीची लागवड करण्यासाठी नांगरणी ट्रॅक्टरने करण्यात आली आहे. अलिकडे गुरे कमी झाल्याने नांगरणी होत नाही, परिणामी कृषी खाते किंवा तालुका शेतकरी सोसायटीत आगाऊ नोंदणी करून नांगरणी केली जाते.
स्वतःची जमीन कसदार असल्याने थोडीशी आर्थिक कळ सोसून ट्रॅक्टरने नागंरणी केली जाते. मात्र यंदा सगळे होऊनही, पाऊस वेळेत नसल्याने शेतीची वाढ खुंटली आहे, असे शेतकरी कोरगावकर यांनी नाराजीच्या सुरात सांगितले.
या स्थितीमुळे नुकसानी कशी भरून काढावी व बँकेकडून घेतलेले उसने कर्ज कसे फेडावे, याची घोर चिंता लागून आहे. या सर्व प्रक्रियेत शेतकरी हवालदिल बनले असून, अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी कोरगावकर यांनी केली.
पेडण्यात ओंकार हत्तीच्या दहशतीमुळे अनेक शेतकऱ्यांना माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी आर्थिक मदतीचा हात दिला असून, त्या थोड्याशा मदतीने किमान शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे कोरगावकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मदत द्यावी
आगामी काही महिन्यांत निवडणूक वर्ष असल्याने, नेतेमंडळी प्रचार, बैठका घेण्यात सक्रिय झाली आहे. त्या मंडळीकडून आवश्यक मदतीची अपेक्षा आहे. या महिन्यात श्री गणेश चतुर्थी सण असल्याने सर्वच दृष्टीने आर्थिक चिंतेचे कारण ते असल्याचे कोरगावकर यांनी व्यक्त केले. कृषी खात्याने याबाबतीत सर्वेक्षण करून गरजू शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.