पणजी : राज्यातील शाळांमध्ये बाहेरील संस्था, व्यक्ती किंवा संघटनांकडून आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्रे किंवा इतर उपक्रम घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करणारे शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक अखेर मागे घेण्यात आले आहे.
या परिपत्रकानुसार, शाळांमध्ये कोणत्याही बाह्य संस्थेला विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास किंवा व्याख्यान, चर्चासत्र, जनजागृती उपक्रम राबवायचा असल्यास संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक करण्यात आले होते. या निर्णयामुळे शाळांच्या स्वायत्ततेवर मर्यादा येतील, तसेच शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांवर अनावश्यक निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त करत विविध स्तरांतून टीका करण्यात आली होती.
आक्षेप नोंदविल्यानंतर शिक्षण परिपत्रकाविरोधात शिक्षण क्षेत्रातील संस्था, पालक, शिक्षक, तसेच विविध सामाजिक संघटनांनी संचालनालयाने हा निर्णय मागे घेतला आहे. परिपत्रक मागे घेतल्याने शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत पूर्वीची कार्यपद्धती कायम राहणार असून, या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.