पणजी : पुढारी वृत्तसेवा
कळंगुट येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अश्पाक खान यांचा आगीत होरपळल्याने गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, हा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय त्यांचे बंधू मुख्तार खान यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
अश्पाक खान आपल्या भागीदार मित्रासोबत हॉटेल व्यवसायात काम करत होता आणि भागीदाराने त्याची ६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक आरोप त्याचा भाऊ मुख्तार खान याने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे..
मुख्तार खान म्हणाले, की अश्पाक खान हे गेल्या २० ते २५ वर्षांपासून कळंगुट परिसरात हॉटेल व्यवसायात कार्यरत होते. सुरुवातीला लहान हॉटेल्स भाड्याने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली होती. मात्र, मेहनतीच्या जोरावर त्यांनी नंतर मोठी हॉटेल्स चालवण्यास घेतली, शुक्रवारी ते आपल्या एका मित्राच्या (भागीदाराच्या) घरी गेले होते. तिथेच ते आगीत गंभीररीत्या भाजले गेले.
अमरावती (विदर्भ, महाराष्ट्र) येथून गोव्यात पोहोचलेल्या अश्पाक यांच्या भावाने पत्रकारांशी बोलताना या मृत्यूबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांच्या आरोपानुसार, अश्पाक यांनी त्यांच्या एका मित्रासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता.
मात्र, व्यवहारातील सर्व पैसे हा मित्र स्वतःकडेच ठेवत असे. मित्राने जवळपास ६ कोटी रुपये दिले नव्हते. संबंधित मित्र हा एक सरकारी कर्मचारी असूनही त्याच्याकडे एवढा मोठा बंगला आणि कोट्यवधी रुपये कुठून आले, असा सवाल खान यांच्या भावाने उपस्थित केला आहे.