कारवार : पुढारी वृत्तसेवा
हाणकोण येथे चार दिवसांपूर्वी उद्योजक विनायक नाईक यांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक केली आहे. जिल्हा पोलिसप्रमुख एम. नारायण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गोवा येथे लिकर उद्योजक असणारे गुरुदास राणे आणि विनायक नाईक यांच्यात काही कारणामुळे वैमनस्य निर्माण झाले होते. या हत्येचे हेच मूळ कारण असल्याची माहिती मिळाली आहे. या हत्येमध्ये सहभागी असणारे अजवाल (23, बिहार), मासूम मंजूर (24, बिहार) यांना दिल्ली येथे तसेच गोव्यातील ज्योतिनाथ (31) याला मडगावमध्ये अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण गुरुदासच्या कंपनीत काम करत होते, असेही एम. नारायण म्हणाले.
राणेचे नाईक यांच्याशी वैमनस्य निर्माण झाले होते. त्यानंतर राणेने नाईक यांच्या हत्येचा कट आखला. त्यानुसार त्यांनी मारेकर्यांना सुपारी दिली. गोवा पोलिसांच्या सहकार्याने संशयितांना अटक करण्यात आली. राणेचा माग काढताना त्याने पणजी येथे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे, असे एम. नारायण यांनी सांगितले.