मडगाव : पुढारी वृत्तसेवा
गुलिस्ता मस्जिद परिसरात घडलेल्या अली खान यांच्या हत्या प्रकरणातील तपासात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आरोपींना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली असून साक्षीदार आणि तक्रारदार कुटुंबीयांवर दबाव आणण्यात येत आहे.
त्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी व्हावी तसेच पीडित कुटुंब आणि साक्षीदारांना पोलिस सुरक्षा द्यावी, तक्रारदार कुटुंबीयांनी केली आहे. अली खान यांच्या कुटुंबीयांनी निवेदनाद्वारे सरकार जवळ पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ड्युटीवरील अधिकाऱ्याने संशयित कादर याला कोठडीत प्रवेश दिला. तसेच काही संशयितांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली.
या मोबाईलच्या माध्यमातून साक्षीदारांना धमक्या देणे तसेच कुटुंबीयांवर दबाव आणणे असे प्रकार घडले. त्यामुळे तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असतानाही उपजिल्हाधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
योग्य वेळी प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे मशिदीबाहेरच घटना घडली आणि त्यानंतर संपूर्ण परिसर कुलूपबंद करण्यात आला. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अधिक बिघडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ही संपूर्ण बाब प्रशासकीय आणि प्रक्रियात्मक त्रुटींचे उदाहरण असल्याचे सांगत कुटुंबीयांनी तातडीने विभागीय चौकशी सुरू करण्याची मागणी केली आहे.