Biometric UPI payments India Pudhari Photo
तंत्रज्ञान

Biometric UPI Payments India: UPI पेमेंटसाठी आता 'पिन' टाकायची गरज नाही, लवकरच येणार जबरदस्त 'फिचर'

डिजिटल इंडिया अजून एक पाऊल पुढे; 2025 पासून UPI व्यवहारांमध्ये बायोमेट्रिक ओळख अनिवार्य होण्याची शक्यता, NPCI कडून नवीन योजनेचे परीक्षण सुरू असल्याची माहिती

मोनिका क्षीरसागर

टेक न्यूज: भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारी बातमी समोर आली आहे. युपीआय (UPI) व्यवहार आता लवकरच अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत. यासाठी चेहरा ओळख (facial recognition) आणि बोटांचे ठसे (fingerprints) यांसारख्या बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहार करता येणार आहेत. पिन (PIN) ऐवजी ही नवीन पद्धत वापरण्याचा विचार सुरू असून, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या दिशेने काम करत आहे.

लवकरच या सुविधेचा पायलट प्रोजेक्ट काही निवडक भागात सुरू होण्याची शक्यता आहे. यशस्वी चाचणीनंतर देशभरात ही सेवा उपलब्ध होईल. युपीआय व्यवहारात बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा समावेश झाल्यास, भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होतील, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. भारतीय डिजिटल व्यवहार प्रणालीसाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरू शकते, जी सुरक्षितता आणि सोय यामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणू शकते.

Summary

  • UPI द्वारे आता लवकरच चेहरा ओळख आणि बोटांचे ठसे वापरून पेमेंट करता येईल

  • या नव्या पद्धतीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होतील.

  • पिन चोरी किंवा फसवणुकीचा धोका कमी होईल.

  • या तंत्रज्ञानामुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे.

पिन चोरी किंवा फसवणुकीचा धोका कमी होणार

युपीआय व्यवहारांपैकी ८०% पेक्षा जास्त व्यवहार भारतात होतात. बायोमेट्रिक व्यवहारांमुळे पिन चोरी किंवा फसवणुकीचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. NPCI गेल्या वर्षभरापासून या योजनेवर काम करत आहे. NPCI ने युपीआय इकोसिस्टममधील कंपन्यांसोबत ही योजना शेअर केली आहे, त्यांच्या अभिप्रायानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल. ही प्रणाली प्रथमच २०२५ मधील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सादर होणार आहे. हा पर्याय 'OTP' पेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आरबीआय, NPCI स्टिअरिंग कमिटी आणि इकोसिस्टमच्या मान्यतेनंतरच ही योजना प्रत्यक्षात येणार आहे. अद्याप NPCI कडून अधिकृत उत्तर मिळालेले नाही.

बायोमेट्रिक पद्धतीने व्यवहार कसे होतील?

बायोमेट्रिक डेटा वापरून युजर्संची ओळख पटवली जाईल. त्यानंतर युजर्संचा बायोमेट्रिक डेटा एक ‘एनक्रिप्टेड की’ मध्ये रूपांतरीत होईल. ही ‘की’ बँकेकडे पाठवली जाईल, जिथे ती सत्यापित होईल आणि व्यवहार पूर्ण होईल. ग्राहकांना व्यवहार करताना फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी यांसारख्या बायोमेट्रिक ओळखीचा वापर करता येईल. यामुळे पासवर्ड किंवा पिन लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. व्यवहाराची प्रक्रिया अधिक जलद आणि सुरक्षित होईल.

युपीआय व्यवहारात काय बदल होणार?

सध्या युपीआय व्यवहारासाठी मोबाईल, इंटरनेट आणि पिनची आवश्यकता असते. बायोमेट्रिक पद्धतीमुळे ग्रामीण भागातील, ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नाही, अशा नागरिकांनाही डिजिटल व्यवहार करता येणार आहेत. आधार आधारित बायोमेट्रिक सेवा केंद्रांवरूनही हे व्यवहार शक्य होतील.

सरकार आणि NPCI ची तयारी

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि सरकारने यासाठी आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधा विकसित करण्यास सुरुवात केली आहे. बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांना नवीन प्रणालीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत.

नागरिकांना नेमका काय फायदा होणार?

  • सुरक्षितता: फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांचा धोका कमी होईल.

  • सुलभता: व्यवहार जलद आणि सहज होतील.

  • समावेशकता: ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांना डिजिटल व्यवहाराची संधी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT