Parenting Relationship Study ( AI-generated image) Pudhari
फीचर्स

Parenting Relationship Study : आई-बाबा झाल्यानंतर जोडीदारावरील प्रेम खरंच कमी होतं? नव्या संशोधनातून समोर आलेलं सत्य

पालकत्वाच्या पहिल्या वर्षातील आव्हानांमुळे नात्यात निर्माण होतो अप्रत्यक्ष दुरावा

पुढारी वृत्तसेवा

Parenting Relationship Study : बाळ जन्माला आल्यानंतर पती-पत्नीचं संपूर्ण जगणं फक्त चिमुकल्याभोवतीच फिरू लागतं. सकाळपासून रात्रीपर्यंतचा संपूर्ण दिनक्रम बाळाच्या गरजा पूर्ण करण्यातच निघून जातो. विशेषतः पहिल्या वर्षभरात दोघेही बाळाची काळजी घेण्यात इतके थकून जातात की, त्यांच्यात पूर्वीसारखे रोमँटिक क्षण उरतच नाहीत. आता एका नव्या संशोधनातून एक वास्तव समोर आलं आहे, की पालकत्वाच्या पहिल्या वर्षात अनेक जोडप्यांना आपल्या जोडीदारावर पूर्वीइतके प्रेम उरले नसल्याची भावना निर्माण होते. यापूर्वीच्या अभ्यासातूनही असं दिसून आलं आहे की, बाळ झाल्यानंतरच्या पहिल्या दोन वर्षांत नात्यातील आनंद आणि समाधान कमी होतं. पण, काळजी करू नका... या समस्येवर काही सोपे आणि प्रभावी उपायही आहेत!

असे झाले संशोधन?

पोलंडच्या व्रोकला विद्यापीठात कार्यरत असलेल्या ॲग्निझका सोरोकोव्स्का यांनी जेव्हा स्वतःचे कुटुंब सुरू केले, तेव्हा आई झाल्यानंतर पती-पत्नीच्या नात्यात काय बदल होतात, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. त्यांनी गरोदरपणाच्या काळात याच विषयावर संशोधन सुरू केले. या संशोधनासाठी सोरोकोव्स्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपत्य नसणाऱ्या ३०० जोडप्यांची निवड केली. तसेच ही जोडपी दोन वर्षांपासून एकत्र राहत होती. पुढे दोन वर्षे दर सहा महिन्यांनी या सर्वांकडून काही प्रश्नावल्या भरून घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, यासाठी जोडप्यातील दोघांनाही एकमेकांपासून वेगळे बसवून प्रश्न विचारले गेले. यात त्यांनी ० ते ६ च्या स्केलवर आपल्या जोडीदारावरील प्रेम आणि नात्याबद्दलची निष्ठा (कमिटमेंट) यांचे गुणांकन केले.

गरोदरपणामुळे नात्यात कोणताही फरक पडत नाही

या अभ्यासादरम्यान ज्या ७१ जोडप्यांना बाळ झाले, त्यांच्या उत्तरांचे संशोधकांनी विश्लेषण केले. त्यांना असे दिसले की, केवळ गरोदरपणामुळे नात्यात कोणताही फरक पडत नाही. मात्र, बाळ जन्माला आल्यानंतरच्या पहिल्याच वर्षात जोडप्यांमधील प्रेम आणि नात्याबद्दलची निष्ठा कमी झाल्याचे समोर आले—जे आधीच्या इतर संशोधनांशी जुळणारे आहे. दुसरीकडे, ज्या जोडप्यांना या काळात मूल झाले नाही, त्यांच्या प्रेमात किंवा नात्यात कोणताही बदल दिसून आला नाही.

अपत्‍यप्राप्‍तीनंतर पहिल्‍या वर्षात जोडप्‍यांमध्‍ये निर्माण होतो दुरावा

सोरोकोव्स्का यांनी केलेल्या संशोधनातून एक वास्तव समोर आलं आहे, की पालकत्वाच्या पहिल्या वर्षात अनेक जोडप्यांना आपल्या जोडीदारावर पूर्वीइतके प्रेम उरले नसल्याची भावना निर्माण होते. सोरोकोव्स्का यांनी गेल्या महिन्यात ब्रिटनमधील एडिनबर्ग येथे झालेल्या एका परिषदेत हे निष्कर्ष मांडले. आता ही मुले मोठी होईपर्यंत या सर्व जोडप्यांचा अभ्यास सुरू ठेवण्याची त्यांची योजना आहे; जेणेकरून नात्यातील हा दुरावा तात्पुरता असतो की दीर्घकालीन, हे शोधता येईल. अर्थात, आधीच्या काही संशोधनांवरून असेही समोर आले आहे की, बाळ मोठे होईल तशी परिस्थिती हळूहळू पुन्हा सुधारते.

बाळ झाल्यानंतरचे पहिले वर्ष नात्यावर ताण आणू शकते

स्वित्झर्लंडमधील झुरिच येथील मानसशास्त्रज्ञ व्हॅलेंटिना राऊच-अँडेरेग म्हणतात, "बाळ झाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षात पती-पत्नीच्या नात्यातील आनंद खूप कमी होतो. दुसऱ्या वर्षात हा आनंद आणखी थोडा घटतो; पण त्यानंतरच्या काही वर्षांत परिस्थिती हळूहळू सुधारू लागते."

ही फार मोठी समस्या नाही; पण नात्यातील बदल जाणवतात

नात्यात होणाऱ्या या सुरुवातीच्या बदलांमुळे नवीन माता-पित्यांच्या आरोग्यावर किंवा मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो, याचे मोजमाप संशोधकांनी केलेले नाही. मात्र, राऊच-अँडेरेग यांच्या मते, यामुळे फार मोठी किंवा गंभीर समस्या निर्माण होत नाही. याचा अर्थ असा मुळीच नाही की त्या जोडप्यांमध्ये काही गंभीर वाद सुरू आहेत आणि त्यांना कौटुंबिक समुपदेशकाची (थेरपिस्टची) गरज आहे; पण हो, आपल्या नात्यात काहीतरी बदल झाला आहे, हे त्यांना नक्कीच जाणवते."

नात्यात का होतो बदल?

प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात आणि संप्रेरकांमध्ये (हार्मोन्समध्ये) होणारे बदल, तसेच बाळाच्या संगोपनाच्या नवीन जबाबदाऱ्यांमुळे पालकांवर येणारा ताण, ही अपत्य जन्मानंतर पती आणि पत्नीमधील नात्यातील दुराव्याचे मुख्य कारण ठरते. अपत्याची जबाबदारी आल्यानंतर पती-पत्नी पूर्वीसारखे रोमँटिक क्षण मिस करतात. संपूर्ण वेळ हा बाळाच्या संगोपनात जात असल्याने चित्रपट किंवा नेटफ्लिक्स पाहणे, तसेच बाहेर फिरायला जाणे या अगदी साध्या गोष्टी करणेही बऱ्याचदा अशक्य होऊन बसते. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो, असे वाटणे साहजिकच आहे.

बाळाच्या जन्मानंतर दाम्पत्यांनी 'या' सोप्या गोष्टी नक्की ट्राय कराव्यात

बाळाच्या जन्मानंतर दाम्पत्याच्या नात्यातील ताण टाळण्यासाठी किंवा आधीसारखाच गोडवा परत आणण्यासाठी संशोधक सुचवतात की, नवीन पालकांनी बाळाच्या संगोपनात आपल्या जवळच्या लोकांची (नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींची) मदत घ्यावी आणि मुख्य म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी जोडीदाराशी मोकळेपणाने बोलाव्यात. तसेच मूल झाल्यानंतरही तुम्हाला तुमच्या नात्यातली कोणती खास गोष्ट किंवा जिव्हाळा तसाच टिकवून ठेवायचा आहे, यावर दोघांनी स्पष्टपणे बोलले पाहिजे. वर्षातून एकदा दोघांनीच कुठेतरी फिरायला जाणे हे नाते अधिक सदृढ करण्यास मदत करणारे ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT