स्वप्निल पाटील, सांगली
Sangli Mass Murder
गाव म्हैसाळ. तेथील वनमोरे कुटुंब. नऊ सदस्यांचं कुटुंब. गावात दोन ठिकाणी राहणारं. शिकलेली माणसं. शेतवडीही असणारी माणसं. जवळ भरपूर पैसा. दिवस उजाडलेला. सूर्य डोक्यावर आलेला. दुपारी बाराचा सुमार. मात्र वनमोरे कुटुंबीय घरातून बाहेर आलेले नव्हते. दैनंदिन व्यवहाराची काही हालचालच नव्हती. झालं, शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला, पण नो रिस्पॉन्स. गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. ते आले आणि दरवाजा तोडला, तर सर्वांना जबरदस्त धक्का. आत दिसले ते नऊ मृतदेह. वनमोरे कुटुंबच खल्लास झालेलं. तारीख होती २१ जून २०२२. म्हैसाळसह जिल्हा हादरला. राज्यभर पसरलेल्या या बातमीनं संवेदनशील मनं हळहळली.
सांगली : महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गाव तीन वर्षांपूर्वी भयावह हत्याकांडानं हादरलेलं. प्रारंभी वाटलेलं, सर्वांनी सामूहिक आत्महत्याच केलीय. कारण तसाच बनाव केलेला, पण पोलिसांनी हा बनाब उघड केला, तेव्हा हत्याकांडाचं हे षड्यंत्र लोकांना कळलं. गुप्तधन मिळतं, या अंधश्रद्धेला बळी पडून जीव गमावलेलं हे कुटुंब. त्यांचा घात केला तो मांत्रिकानं.
सोलापूर जिल्ह्यातील एक मांत्रिक शेतातील गुप्तधन शोधून देतो, तसेच तो पैशाचा पाऊस पाडतो, अशी कुणकुण वनमोरे कुटुंबाच्या कानावर आलेली. त्यामुळं गुप्तधनाची लालसा म्हैसाळमधील या सधन आणि सुशिक्षित वनमोरे कुटुंबामध्ये निर्माण झाली. डॉ. माणिक बनमोरे हे पशुवैद्यकीय डॉक्टर, तर पोपट वनमोरे शिक्षक होते. डॉ. वनमोरे यांची पत्नी रेखा, मुलगा आदित्य, मुलगी प्रतिभा, तर शिक्षक पोपट वनमोरे, पत्नी संगीता, मुलगा शुभम, मुलगी अर्चना आणि डॉ. माणिक आणि पोपट यांची आई आक्काताई हे सर्वजण म्हैसाळमध्ये राहत. उच्चशिक्षित असणारे डॉ. माणिक आणि शिक्षक पोपट हे शेतात गुप्तधन आहे, अशा भ्रमात होते. शोध घेतल्यास गुप्तधन मिळू शकते, अशा स्वप्नाशी ते खेळत असावेत. त्यामुळं गुप्तधन कोण शोधून देतो का? याचा शोध त्यांनी घेतला. यावेळी काही मंत्रतंत्राचे विधी केल्यानंतर गुप्तधन मिळण्याचा मार्ग सुकर होईल, अशी माहिती त्यांना मिळाली. त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी मेंदू चालवला पाहिजे होता, पण ते घडले नाही. झाला तो केमिकल लोचा.
सोलापूर जिल्ह्यातील एक मांत्रिक आहे, तो गुप्तधन शोधून देतो, काही गुप्त विधी केल्यास शेतातील गुप्तधन मिळेल, तसेच पैशाचा पाऊस पडेल, अशी आशा दोघा भावंडांना लावण्यात आलेली. यासाठी दोघांनीही सोलापूर जिल्ह्यातील त्या मांत्रिकाला गाठले. येथून दोन्ही कुटुंबांच्या अंताच्या प्रवासाला प्रारंभ झाला.
डॉ. माणिक आणि पोपट यांचा स्वभाव मनमिळावू, त्यांची गावात सगळ्यांशी घसट. कोणाशीही वैर नाही. गुप्तधन मिळवायचं असेल, तर या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये, असा दम मांत्रिकानं भरलेला. त्यामुळं दोन्ही कुटुंबांनी मौन पाळलेलं. एक दिवस तो मांत्रिक वनमोरे कुटुंबीयांच्या घरी आला, दोन्ही कुटुंबे सघन असल्याचे त्याने हेरले. गुप्तधनासाठी विधी करावे लागतील, असं त्यानं सांगितलं. त्यानुसार अनेकवेळा विधी केले होते. घरात, शेतात, विधी, तंत्र-मंत्र सगळं करून झालेलं, पण वनमोरे कुटुंबाला गुप्तधन काही मिळेना. ते मिळण्यासाठी वनमोरे कुटुंबांनी लाखो रुपये उधळले होते. अर्थात, ते पैसे मांत्रिकाच्या घशात गेलेले.
मांत्रिकाला लाखो रुपये देऊनही पैशाचा पाऊस पडला नव्हता. त्यामुळं गुप्तधन मिळेल की नाही, याची बनमोरे कुटुंबीयांना शंका येऊ लागली. कारण गुप्तधन मिळण्यासाठीचे मांत्रिकानं सांगितलेले सर्व उपाय करून झालेले, पण हाती मिळाला होता भोपळा. शेवटी व्हायचे तेच झाले. वनमोरे कुटुंबाने मांत्रिकाला दिलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावलेला. मांत्रिक मात्र गुप्तधन देतोच, असं सांगत होता. अखेर २० जून २०२१ उजाडला. यादिवशी अखेरचा विधी करण्याचे ठरले. त्यासाठी मांत्रिकानं कुटुंबातील सगळी माणसं उपस्थित राहिलीच पाहिजेत, असं बजावलं. त्यामुळे कोल्हापूरमध्ये एका बँकेत नोकरीस असलेल्या प्रतिभा वनमोरे हिलाही बोलावून घेण्यात आलं. या विधीसाठी गावातून अनेक दुकानांतून नारळ, विधीचे अन्य साहित्य खरेदी करण्यात आले. शिक्षक असणाऱ्या पोपट यांनी त्यांच्या घराजवळ असणाऱ्या दुकानातून नारळ नेले होते. त्यावेळी दुकानदाराने 'इतके नारळ कशाला?' असेही विचारले होते, त्याबर 'काम आहे, तू दे,' असे म्हणून त्यांनी नारळ आणलेले.
डॉ. माणिक आणि पोपट हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी पूजा मांडण्याचं ठरलं. मात्र यावेळी कोणी एकमेकांशी बोलायचं नाही, असं फर्मान मांत्रिकानं सोडलं. एकमेकांशी बोलला, तर पूजेत व्यत्यय येईल, अशी भीती त्यानं वनमोरे कुटुंबाला घातली.
ठरल्याप्रमाणं मांत्रिकानं दोन्ही घरात सर्वांना बसवलं. सुरुवातीला शिक्षक पोपट वनमोरे यांच्या घरात ही अघोरी पूजा करण्याचं ठरलं. त्यानंतर डॉ. माणिक यांच्या घरातही. दोन्ही घरी पूजा करून मांत्रिकानं मात्र धूम ठोकली.