दहशतवादविरोधी एका मोठ्या मोहिमेत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने केंद्रीय एजन्सी आणि राज्य एटीएस युनिटस्च्या समन्वयाने संपूर्ण भारतात ‘इसिस’संबंधित एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून पाच अत्यंत कट्टरपंथी तरुणांना अटक केली आहे. त्यात कल्याण, मुंब्य्रातील दोन तरुणांचा समावेश आहे. ‘प्रोजेक्ट मुस्तफा’च्या नावाखाली भारतातील काही राजकीय नेत्यांच्या हत्या आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा त्यांनी कट रचला होता, अशी माहिती तपास यंत्रणांच्या चौकशीतून समोर आली आहे...
अमोल देशपांडे, ठाणे
या दहशतवादविरोधी मोहिमेत एटीएस व दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रोजेक्ट मुस्तफा मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून पाच अत्यंत कट्टरपंथी तरुणांना अटक केली आहे. त्यात कल्याणच्या आफताब कुरेशी (25) तर मुंब्रातील सुफियान अबुबकर खान (20) या दोन तरुणांचा समावेश आहे. अटक केलेले सर्व संशयित 20 ते 26 वर्षे वयोगटातील असून ते पाकिस्तानस्थित हँडलरच्या थेट संपर्कात राहून भारतात कट्टरपंथीय तरुणांचे नेटवर्क स्थापित करण्याचे काम करत होते. या मॉड्यूलचे नेतृत्व झारखंडमधील बोकारो येथील रहिवासी अशर दानिश (23) करत होता. हाच दानिश या सार्या प्रोजेक्टचा मुख्य सूत्रधार होता. तो पाकिस्तानमधील एका हँडलरच्या थेट संपर्कात होता. प्रोजेक्ट मुस्तफा नावाचा 40 सदस्यांचा सोशल मीडिया ग्रुप देखील चालवत होता, जो जिहादी कारवाया करण्यासाठी आणि सदस्यांची भरती करण्यासाठी वापरला जात होता.
दानिशने ‘प्रोजेक्ट मुस्तफा’च्या नावाखाली भारतातील काही राजकीय नेत्यांच्या हत्या आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचला होता, असे यंत्रणांच्या तपासातून समोर आले आहे. या दानिशने ठाणे जिल्ह्यातील कल्याणचा राहणारा आफताब आणि त्याचा मुंब्य्रातील सहकारी सुफियान अबुबकर खान या दोघांना ऑनलाईन हेरून आपल्या जाळ्यात ओढत देशविघातक कारवायात सामील करून घेतले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने गेल्या आठवड्यात दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून दोघांना दिल्लीवरून मुंबईत परतत असताना अटक केली होती. यावेळी दोघांकडे 32 बोअरचे दोन सें.मी. ऑटोमॅटिक पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसे सापडली होती. या दोघांचा संपर्क दानिश सोबत इंटरनेटच्या माध्यमातून झाल्यानंतर ते इसिससोबत जोडले गेले होते, अशी माहिती दोघांच्या चौकशीतून समोर आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र एटीएस व स्थानिक पोलिसांनी कल्याण आणि मुंब्रा येथे संशयितांच्या घरावर छापेमारी करून काही डिजिटल उपकरणे आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त केले आहेत.
देशविघातक कारवाईत गुंतलेले हे दहशतवादी सोशल मीडियावर व्हॉटस्अप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुकवर सक्रिय राहून एकमेकांच्या संपर्कात राहात होते. एकमेकांशी संपर्क करताना ही मंडळी सांकेतिक भाषेचा वापर करत असत. यामध्ये गज्बा लीडर, प्रोफेसर आणि सीईओ कंपनी असे कोड सामील होते. ऑनलाईन कट्टरपंथी युवकांना हेरून दानिश त्यांना ऑनलाईन जिहादी प्रशिक्षण देत होता. त्यासाठी त्याने हत्या घडवून आणणे, बॉम्ब बनवणे असे घातक प्रशिक्षण देण्याचे वेगवेगळे प्रोजेक्ट बनवले होते. त्याने तेलंगणातील निजामाबाद येथील फार्मसीचा विद्यार्थी हुझैफ यमन (20) याला शस्त्रास्त्रे बनवण्याचे काम दिले होते; तर कल्याणच्या आफताब कुरेशीची निवड त्याने कट्टरपंथी तरुणांना हेरून त्यांना भरती करण्यासाठी केली होती. कुरेशी कट्टरपंथी व्हिडीओ वापरून तरुणांचे ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील करून घेत होता; तर मध्य प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या कामरान कुरेशीवर या ऑपरेशनसाठी निधी जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
कल्याणचा आफताब कुरेशी हा तरुण गेल्या अनेक महिन्यांपासून दहशतवादी ग्रुपच्या संपर्कात होता. त्याचे वडील कल्याण शहरात मटण विक्रीचा व्यावसाय करतात. कुरेशीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार तो सतत मोबाईलमध्ये व्यस्त असायचा. तो सतत व्हिडीओ पाहात असायचा. यावरून त्याच्या कुटुंबामध्ये वाद देखील निर्माण झाला होता. त्यावेळी त्याला कुटुंबाने मारहाण देखील केली होती. तो ऐकत नव्हता. त्याला कुठेही जाण्यास त्याच्या घरच्यांनी मनाई केली होती. मात्र तरी देखील तो आपल्या एका मित्रासोबत दिल्लीला पोहोचला. मला माझ्या मित्राच्या गावी जायचे आहे, असे सागून तो घराच्या बाहेर पडला होता. त्याने वडिलांच्या मोबाईलमधून ऑनलाईन पैसे देखील घेतले होते, असा दावा त्याच्या कुटुंबाने केला आहे.
पकडले गेलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हे सारे तरुण ठाण्यातील पडघा-बोरिवली येथील कुख्यात दहशतवादी साकीब नाचणच्या विचाराशी प्रेरित होते, असे तपासातून स्पष्ट झाले आहे. या दहशतवाद्यांनी दोन गट तयार केले होते. ज्यात एक गट दहशतवादी कारवाईत नव्या तरुणांना भरती करण्याचे काम करत असे; तर दुसरा गट गजवा-ए-हिंद शैलीचा जिहाद राबवणे, ज्यामध्ये भारतातील काही राजकीय नेत्यांच्या हत्या आणि दहशतवादी हल्ले यांचा समावेश होता. हाच गट साकीब नाचणच्या विचारधारेने प्रेरित होऊन अल शाम नावाचे मुक्त क्षेत्र घोषित करण्याची योजना आखत होता. दाहशवाद्यांच्या या कटाचा सुगावा गेल्या सहा महिन्यांपूर्वी तपास यंत्रणांना लागला होता. तेव्हापासून या दाहशवाद्यांच्या हालचालींवर यंत्रणांनी नजर ठेवली होती. तर पडघा येथे देखील एटीएस पथकाने सर्च ऑपरेशन राबवले होते.