नरेंद्र राठोड, ठाणे
इतर प्रांतातील भाईमंडळींची क्रेझ राज्यातील तरुणाईत वाढू लागली आहे. पंजाब व हरियाणा प्रांतांत दहशत माजवणारा कुख्यात डॉन लॉरेन्स बिष्णोई आणि मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात गँगवारमध्ये मारला गेलेला दुर्लभ कश्यप यांच्या आयुष्यावर बनवण्यात आलेले लाखो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. गुन्हेगारी जगतातील या गुंडांच्या लाईफस्टाईलची भुरळ अनेक तरुणांना पडत आहे. खांद्यावर रुमाल, कपाळावर टिळा, डोळ्यात काजळ, शर्टाचे एक बटण उघडे, गळ्यात काळा दोरा, मोठे लॉकेट, वाढलेली दाढी, लेदर जॅकेट अशी वेशभूषा केलेले अनेक तरुण अलीकडे गल्लीबोळात दिसून येतात. गेल्या काही वर्षांत राज्याबाहेरील डॉन मंडळींची क्रेझ तरुणाईत झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या तरुणाईमध्ये सर्वाधिक क्रेझ आहे ती हरियाणा, पंजाब राज्यातील डॉन लॉरेन्स बिष्णोई व मध्य प्रदेशातल्या उज्जैन शहरातील गुंड दुर्लभ कश्यपची.
कपाळावर आडवा टिळा, डोळ्यात काजळ, खांद्यावर रुमाल, गळ्यात माळा असा अवतार केलेला दुर्लभ कश्यप हा मिसरूडदेखील नीट न फुटलेला 20 वर्षाचा युवक अल्पावधीतच अल्पवयीन युवकांमध्ये मोठा लोकप्रिय झाला होता. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते होते व तो सरळ सरळ सोशल मीडियावरून आपल्या भाईगिरीचा प्रचार करायचा. त्याने आपल्या फेसबुकवर कुख्यात बदमाश, खुनी, व्यावसायिक गुन्हेगार, कोणत्याही वादासाठी संपर्क करा असे लिहून ठेवले होते. मात्र, या दुर्लभचा आततायीपणा जास्त काळ चालला नाही व त्याची सप्टेंबर 2020 मध्ये हत्या करण्यात आली. दुर्लभ मारला गेल्यानंतर त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागले. त्याच्या जीवनावर आधारित प्रत्येक व्हिडीओला लाखो व्ह्यू मिळू लागले. सध्या तर दुर्लभ कश्यप सोशल मीडियावर ट्रेंड बनला आहे.
गुन्हेगारी जगतातील आणखी एक कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईदेखील मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये येऊ पाहात आहे. बिष्णोईने अभिनेता सलमान खान याला धमकी दिल्यापासून तो चर्चेत आला असून त्याच्या जीवनावर आधारित अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिष्णोई टोळीत अनेक तरुण उच्चशिक्षित असून टोळीतील हेच सदस्य सोशल मीडियावरून हे सारे व्हिडीओ व पोस्ट व्हायरल करीत असल्याचे देखील बोलले जाते. बिष्णोई सध्या जेलमध्ये असूनही तो सर्रास मोबाईल वापरतो. तो स्वतः जेलमधून सार्या सोशल मीडियावरच्या चर्चांवर नजर ठेवून असतो. तसेच जेलमधून व्हिडीओ कॉल करून धमकी देणे, खंडणी वसुली करणे, सुपारी देणे आदी कामे तो फोनच्या मदतीने करतो.
काही दिवसांपूर्वी बिष्णोई गँगने प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर गोळीबार करून सार्या बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा गोळीबार लॉरेन्सच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे. लॉरेन्सने जेलमधून कपिल शर्माशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कपिर्लने त्याचा फोनच स्वीकारला नाही. त्यानंतर क्रोधित झालेल्या बिष्णोईने सरळ सरळ कपिल शर्माच्या कॅनडास्थित कॅफेवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर गोळीबाराची घटना घडवल्यानंतर बिष्णोई टोळीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करीत या घटनेची जबाबदारी घेतली. याच पोस्टमध्ये कपिल शर्माला बिष्णोई टोळीने धमकी देत आता फोनची रिंग ऐकू नाही आली तर मुंबईत त्याचे परिणाम दिसतील, असा इशारा दिला आहे. सध्या मुंबई पोलिसांनी कपिल शर्माला कडेकोट सुरक्षा दिली आहे.
बिष्णोई टोळी सोशल मीडियावरून एकमेकांच्या संपर्कात असते. ही टोळी तरुणाईला आकर्षित करण्यावर जास्त भर देते. त्यासाठी या टोळीने सोशल मीडियाचा वापर सुरू केला असून ते वेगवेगळे कंटेंट बनवून तरुणाईला आकर्षित करीत असतात. बिष्णोई टोळी छोट्या-मोठ्या गुन्ह्यात अडकलेल्या तरुणांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते. पोलिस ज्यांच्या शोधात आहेत, त्यांची माहिती मिळवून त्यांना मदत करण्याचा, पोलिसांपासून वाचविण्यासाठी आश्रय देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर त्यांना आपल्या टोळीत सामील करून घेऊन त्यांच्याकडून मोठे गुन्हे करवून घेते.