पुढारी ऑनलाईन :
Money Plant हे वाढवायला आणि सांभाळायला अतिशय सोपे रोप मानले जाते. हृदयाच्या आकाराच्या पानांमुळे ते घराची शोभा वाढवतेच, शिवाय हे रोप घरात धन आणि समृद्धी आणते, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार, या रोपाची योग्य काळजी घेतली तर ते आर्थिक लाभ आणि भरभराट आकर्षित करू शकते.
मात्र, काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास याचा उलट परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, रोपाची दिशा किंवा त्याची निरोगी वाढ याकडे लक्ष न दिल्यास घरात आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता वाढू शकते असे मानले जाते. जर तुमच्यासोबत असे घडत असेल, तर या ५ चुका तपासा.
Money Plant लावताना टाळा या ५ चुका
चुकीच्या दिशेत ठेवणे
वास्तुनुसार, Money Plant कोणत्या दिशेत ठेवले आहे, याचा धनप्रवाहावर मोठा परिणाम होतो. हे रोप कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
त्याऐवजी हे रोप आग्नेय दिशेला ठेवावे. या दिशेत भगवान गणेशाचे वास्तव्य मानले जाते. त्यामुळे अडथळे दूर होऊन समृद्धी येते.
वेल जमिनीला स्पर्श होत असेल तर...
Money Plant ची वाढ वेगाने होत असल्याने त्याच्या वेली जमिनीला लागू नयेत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तुनुसार, वेल जमिनीला लागणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे प्रगती थांबू शकते. हे देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते. त्यामुळे वेल वर ठेवण्यासाठी दोरी किंवा काठीचा आधार द्यावा.
पाने कोमेजलेली किंवा सुकलेली ठेवणे
Money Plant ची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. सुकलेली किंवा पिवळी पडलेली पाने आर्थिक तणाव आणि दुर्भाग्याचे संकेत मानले जातात. म्हणून पिवळी पाने लगेच काढून टाका आणि रोप हिरवेगार व निरोगी राहील याची काळजी घ्या. चांगली वाढलेली रोपे घरात आनंद, समृद्धी आणि धन आकर्षित करतात.
चुकीच्या कुंडीत लावणे
योग्य कुंडी निवडणे देखील आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे मानले जाते. Money Plant साठी निळ्या रंगाची काचेची बाटली किंवा मातीची कुंडी सर्वोत्तम मानली जाते. प्लास्टिकच्या कुंड्या किंवा घाणेरड्या भांड्यांचा वापर टाळावा. कारण अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.
Money Plant इतरांना देणे
तुमचे Money Plant चांगले वाढत असेल तर त्याची फांदी किंवा कटिंग इतरांना देणे टाळावे, असे वास्तुशास्त्र सांगते. असे केल्याने ऐश्वर्य आणि समृद्धीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह नाराज होतो, अशी मान्यता आहे. तसेच, त्यामुळे तुमच्या घरातील सुख-समृद्धी दुसऱ्याकडे जाते, असेही मानले जाते.