आई-वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यावरही भिक्षेस गेल्यावर एक दिवस ज्ञानेश्वरांचा अपमान झाला. ज्ञानेश्वरांचे वय कोवळे होते. ते फार व्यथित झाले. त्यांना अपमानाचा उद्वेग आला होता. ते घरी आले. झोपडीचे दार बंद करून एकटेच आतल्या आत धुमसत बसले.
'आता आपण कोणाकडे जायचे नाही, कोणाशी बोलायचे नाही', असा निर्धार त्यांनी केला. लहानग्या मुक्ताईने हे पाहिले. सर्व प्रकार तिच्या लक्षात आला.
संत मुक्तवाईने ज्ञानेश्वरांना 'दादा दादा, बाहेर ये, असा वसू नकोस', अशा हाका मारून पाहिल्या; पण आज ज्ञानेश्वरांची मनस्थिती फार बिघडली होती. ते काही ऐकत नव्हते, प्रतिसाद देत नव्हते. लहान बहीण असूनही त्यादिवशी मुक्ता आईच्या भूमिकेत शिरली.
तिने ज्ञानेश्वरांची समजूत काढायला अभंग म्हणणे सुरू केले. या अभंगातून त्यांनी लोक वाईट वागले तरी आपण विचलित होऊ नये, आपला चांगला मार्ग सोडू नये, संताला हे शोभत नसते, अशा प्रकारचे विचार मांडले.
योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा ॥ विश्व रागे झाले वन्ही। संत सुखी व्हावे पाणी ॥शब्दशस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश ॥ विश्वपट बह्मदोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
वारकरी सांप्रदायात महिला संतांचे कार्य अलौकिक आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा ठसा मराठी मनावर आहे. त्या ज्ञानेश्वर माऊलींना ताटीच्या अभंगातून उपदेश करणाऱ्या संत मुक्ताबाई या त्यांच्या लहान भगिनी. त्यांनी ताटीचे अभंग लिहून झोपडीचे दार बंद करून बसलेल्या आपल्या बंधूला, ज्ञानेश्वरांना ते उघडावे म्हणून विनंती केली. संत मुक्ताबाईचे ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत.
वरच्या अभंगात ज्ञानेश्वरांना त्या आदिनाथांपासून गहिनीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती, ज्ञानदेवांकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून देतात. घराण्याचे मोठेपण, योगीपण याचे स्मरण देतात. जो जणांचा अपराध सहन करतो तो योगी. अवघे जग जरी आपल्यावर रागावले तरी पाण्यासारखं थंडपण घेऊन या क्रोधाला शांत करायचे असते.
लोकांनी शब्दरूपी शस्त्राने त्रास दिला तरी त्यांचा चांगला उपदेश मान्य करावा, अशा शब्दांमध्ये मुक्ताबाई माऊलींना ताटीच्या अभंगांमध्ये समजावतात. अप्रतिम असे हे ताटीचे अभंग खूप महत्त्वाचे आहेत. संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे १२७९ मध्ये झाला. लहान वयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावांना 'संन्याशाची पोरं' म्हणून वाळीत टाकून समाजाने त्यांची अवहेलना केली. हे सारे अपमान सहन करत असताना या चारही भावंडांनी विद्येची अखंड उपासना केली. ज्ञानेश्वरांनी ताटीचे दार उघडलं. त्यानंतर त्यांच्या हातून लौकिक असं कार्य झालं. या कार्याला निवृत्तीनाथांचा आशीर्वाद आणि मुक्ताबाईंची प्रेरणा होती. समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशा मुक्ताबाईंच्या अभंग रचना आहेत.