Raksha Bandhan 2026 Shubh Muhurat: श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला एक दुर्मिळ अशी खगोलीय घटना घडणार आहे. या दिवशी या वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण लागणार आहे. राखी पौर्णिमेच्या पवित्र सणादिवशीच चंद्र ग्रहण लागणार आहे. त्यामुळे देशभरात एक साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या चंद्र ग्रहणामुळं राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्तावर काही परिणाम तर होणार नाही ना? चला तर मग ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून याचा प्रभाव कसा असणार आहे याची माहिती घेऊयात.
ऑगस्ट महिन्यातील चंद्र ग्रहण हे २८ तारखेला लागणार असून हे एक खंडग्रास (Deep Partial Lunar Eclipse) चंद्रग्रहण आहे. या चंद्र ग्रहणाची वेळ ही सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होत असून सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्याची तीव्रता अधिक असणार आहे. या एकूण चंद्र ग्रहणाचा कालावधी हा जवळपास ५ तास ३९ मिनिटे राहणार आहे.
हे चंद्र ग्रहण हे प्रामुख्याने युरोप, अफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका या भागात दिसणार आहे. भारतात हे चंद्रग्रहण अजिबात दिसणार नाहीये. त्याशिवाय पश्चिमी आशिया आणि अटलांटिक महासागराच्या काही भागात देखील हे चंद्रग्रहण दिसू शकते.
हिंदू धर्मशास्त्रानुसार तसेच वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहणाचे सूतक काल आणि धार्मिक नियम हे फक्त त्याच भागात लागू होतात ज्या भागात ग्रहण प्रत्यक्ष दिसणार आहे.
२८ ऑगस्ट रोजी चंद्र ग्रहण भारतात कुठेही दिसणार नाहीये. त्यामुळं भारतात सूतक काळ नसणार. सूतक नसल्यामुळं मंदिराची दारे बंद करणे, दैनिक पूजा अर्जना थांबवणे या सारख्या गोष्टींची गरज नाहीये. भाविक कोणतीही शंका मनात न ठेवता आपली पूजा, दान आणि धार्मिक कार्ये सामान्य स्वरूपात करू शकतात.
ग्रहण आणि सूतक याचा भारतावर काहीच प्रभाव पडणार नसल्यामुळं राखी पौर्णिमा साजरी करण्यावर देखील कोणताही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. त्यामुळे सर्वांनी कोणतीही शंका मनात न ठेवता सकाळी कोणत्याही शुभ मुहूर्तावर रक्षा बंधन साजरे करण्यास कोणतीही हरकत नाहीये.
राखी पौर्णिमा २०२६ साठी पंचांगानुसार भद्रा आधीच संपणार आहे. त्यामुळे २८ ऑगस्टची सकाळ राखी बांधण्यासाठी अत्यंत शुभ आणि दोषमुक्त असणार आहे.