म्युच्युअल फंडातील एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्यामध्ये ठरावीक वेळेला, ठरावीक रक्कम, ठरावीक कालांतराने (जसे दर दिवशी, प्रति महिना,तिमाही, सहामाही, वार्षिक) असे म्युच्युअल फंड योजनेमध्ये नियमितपणे पैसे गुंतवले जातात. पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरत आहे.
आज आपल्या देशातून 9.61 कोटी खात्यांतून 23,547 हजार कोटी दर महिन्याला गुंतवणूक होत आहे. आज 66 लाख कोटी इतके म्युच्युअल फंड संपत्तीचे मूल्य झाले आहे. आज म्युच्युअल फंडामध्ये विविध मालमत्तेमधील जवळपास अडीच हजार योजना उपलब्ध आहेत. कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक करावी, हा प्रश्न गुंतवणूकदाराला पडतो? मागील काही वर्षांतील चांगला परफॉर्मन्स दिलेल्या योजनेत मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली जाते. अशा पद्धतीने निवड करणे ही पद्धत चुकीची आहे. मागील काळात योजनेने दिलेला परतावा, त्याच प्रमाणात भविष्यामध्ये देईलच, असे सांगता येत नाही. म्हणून गुंतवणूक करत असताना त्या योजनेची माहिती, कोणकोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे, त्यामध्ये असणारी बाजारातील जोखीम समजावून घेतली पाहिजे, योजनेचे निकष अभ्यासपूर्व निरीक्षण करून, आपली आर्थिक उद्दिष्टे आणि त्याचा कालावधी आणि गुंतवणुकीतील जोखीम पाहून गुंतवणुकी बाबत निर्णय घेतला पाहिजे.
गुंतवणूक करण्यापूर्वी प्रथम आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा आराखडा तयार केला पाहिजे. वाढत्या महागाईनुसार कोणत्या वर्षी किती पैशांची गरज आहे, हे ठरविले पाहिजे. उदा . मुलांच्या शिक्षणाची तरतूद करायची असेल, तर तो मुलगा किती वर्षांचा आहे आणि उच्च शिक्षणासाठी किती वर्षांचा अवधी आहे आणि शिक्षण क्षेत्रातील महागार्ईचा अंदाज घेऊन एक बजेट ठरवले पाहिजे. जर मुलगा चार वर्षांचा असेल, तर आजपासून 14 वर्षानंतर मुलाच्या 18 व्या वर्षापासून उच्च शिक्षणासाठी पदवीसाठी चार वर्षे अशी प्रत्येक वर्षी पैशाची गरज भासणार आहे.
सध्या पुण्यामध्ये इंजिनिअरच्या उच्च शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी चार लाखप्रमाणे 16 लाख रुपये खर्च येतो. शिक्षण क्षेत्रातली वाढती महागाई 9% ने गृहीत धरली, तर आजपासून 14 वर्षानंतर 60 लाख रुपये अपेक्षित खर्च येऊ शकतो. हा 60 लाख रुपयांचा फंड निर्माण करण्यासाठी पंधरा वर्षे अवधी आहे; तर तुम्ही मोठी जोखीम घेऊन गुंतवणूक सुरू करू शकता. साधारणपणे 12 टक्के परतावा गृहीत धरून 12,500/- रुपये दर महिन्याला एसआयपी गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आपल्या आयुष्यातील आर्थिक उद्दिष्टे ठरवून वाढत्या महागाईनुसार किती रक्कम लागणार आहे? याचा अंदाज घेऊन गुंतवणूक केली तर अधिक उत्तम आहे.
गुंतवणूक किती करावी? हे प्रत्येकाच्या उत्पन्न व खर्चाच्या बजेटवरून ठरते. याबाबत चार प्रकारचे संभाव्य गुंतवणूकदार पहावयास मिळतील. पहिला -
कर्जदार : या लोकांचे उत्पन्न कमी, मात्र खर्च जास्त असतो. घरात 100 रु. उत्पन्न असेल तर खर्च 110 रु. करत असतात. 10 रु. उसने घेऊन खर्च करतात. आजच खर्च करून आनंद घ्यायचा, उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे? या वृतीने ते जगत असतात. यांना गुंतवणुकीला वाव मिळत नाही. यांचे भवितव्य कर्जबाजारी, आर्थिक कलह, उधारी अशा प्रसंगांनी भरलेले असते. भवितव्य अंधकारमय दिसते.
बचतदार : या वृत्तीचे लोक बचतीला प्राधान्य देतात. आलेल्या उत्पन्नापैकी दहा ते वीस टक्के रक्कम नेहमी बचत करतात आणि पारंपरिक ठिकाणी गुंतवणूक करतात. हे लोक सुरक्षित गुंतवणुकीस महत्त्व देतात. यांना बचत आणि गुंतवणुकीमधील फरक माहिती नसतो. यांचा पैसा वाढतच नाही, अशा बचतदार लोकांचा पैसा न वाढल्याने महागाई यांचा पैसा खाऊन टाकत असते आणि मग यांची परिस्थिती जेमतेमच राहते.
गुंतवणूकदार : या प्रकारच्या लोकांकडे आलेल्या उत्पन्नातून प्रथम 20 ते 25 टक्के रक्कम बचत करतात आणि ती बचत वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः गुंतवणूक करतात. गुंतवणूक क्षेत्राचा स्वतः अभ्यास करून गुंतवणूक निर्णयाबद्दल जागृत राहतात. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, बाँड अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या बुद्धीने गुंतवणूक करतात. ती योग्य ठिकाणी वेगवेगळ्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करीत असतात. त्यांच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध होत असतो.
ज्ञानी गुंतवणूकदार : या प्रकारच्या लोकांच्याकडे एक मोठी आर्थिक शिस्त असते. आर्थिक नियोजनद्वारे आर्थिक उद्दिष्टांचा आराखडा तयार करून आलेल्या उत्पन्नातून किमान 30 ते 40टक्के रक्कम एखाद्या चांगल्या सल्लागारांच्या सल्ल्याने गुंतवणूक करतात. त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या जोखीम घेण्याच्या स्वभावानुसार गुंतवणूक निर्णय घेतात. हेच लोक खर्या अर्थाने वारेन बफेट सारखी मोठी संपत्ती निर्माण करतात. यासाठी भांडवली बाजारामधील जोखीम स्वीकारताना पैसा वाढविण्यासाठी वेळ देतात. गुंतवणुकीचा प्रत्येक निर्णय सल्लागाराच्या मदतीने घेत असतात.
गुंतवणूक किती करावी, या प्रश्नाचे उत्तर आर्थिक नियोजनच्या भाषेत द्यायचे असेल, तर जर तुमच्या घरामध्ये शंभर रुपये उत्पन्न येत असेल, तर प्रथम 6 ते 9 महिन्यांचा खर्च आपत्ती व्यवस्थापन म्हणून शिल्लक ठेवा. कुटुंबाचा दैनंदिन खर्च करताना आवश्यक गोष्टीवर खर्च करा, अनावश्यक खर्च टाळा अन् एकूण खर्च 40 टक्क्यांपर्यंत करा. निरनिराळ्या प्रकारची कर्ज हप्त्याची रक्कम 40% पेक्षा जास्त करू नका. जितके कर्ज कमी तितक्या गुंतवणुकीस जास्त प्राधान्य द्या. विविध प्रकारच्या विमा संरक्षणासाठी खर्च 6% पेक्षा जास्त नसावा. किमान शिल्लक 30 ते 35% रक्कम आर्थिक उद्दिष्टानुसार भांडवली बाजारात गुंतवणूक करा. हा फॉर्म्युला अंमलात आणला, तर निश्चितच ते कुटुंब श्रीमंती आणि समृद्धीकडे जाऊ शकते.
एसआयपी गुंतवणूक करताना मी का गुंतवणूक करावी? कशासाठी करावी? आणि किती कालावधीसाठी करावी? हे प्रश्न फार महत्त्वाचे असतात. म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये सुरक्षितता आणि जोखीम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुरक्षित गुंतवणुकीमध्ये तुम्हाला परतावा अल्प प्रमाणात मिळतो आणि जोखीमयुक्तगुंतवणुकीमध्ये चांगला परतावा मिळतो. ‘जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त’ असे समीकरण पहावयास मिळते. दोन-तीन वर्षांसाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर ऋण बाजार ऊएइढ चरीज्ञशीं मधील योजनाची निवड करा. पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल, तर डेट ओरिएंटेड बॅलन्स फंड अथवा इक्विटी बॅलन्स फंडामधील योजनांची निवड करावी. आठ ते दहा वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर लार्ज कॅप फंडामधील योजनांची निवड करावी. पंधरा-वीस वर्षांसाठी करायची असेल, तर फ्लेक्सी कॅप, मिड कॅप, स्माल कॅप योजनांची निवड करावी. जितका कालावधी जास्त तितकी जोखीमयुक्तगुंतवणूक योजनांची निवड करावी.