Raghav Chadha BJP Join Reason: राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टीला मोठा धक्का देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी आपल्या भूमिकेचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. राघव चड्ढा आता अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात सामील झाले असून त्यांच्या सोबत आणखी सहा खासदारांनीही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
एका व्हिडिओत राघव चड्ढा यांनी आपल्या निर्णयामागची कारणं सांगितली आहेत. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत, तर काही जण त्यांच्या या निर्णयामागचं खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांनी थेट जनतेसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला.
राघव चड्ढा म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत मला सतत असं जाणवत होतं की पक्ष आपल्या मूळ विचारांपासून दूर गेला आहे. पक्ष आता सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी नव्हे, तर काही व्यक्तींच्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करत असल्याचं मला जाणवत होतं.”
त्यांनी सांगितलं की त्यांच्या समोर तीन पर्याय होते. पहिला म्हणजे राजकारण पूर्णपणे सोडून देणं. दुसरा म्हणजे पक्षात राहून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणं. आणि तिसरा पर्याय म्हणजे आपल्या अनुभव आणि उर्जेच्या जोरावर दुसऱ्या पक्षात जाऊन सकारात्मक राजकारण करणं. अखेर त्यांनी तिसरा पर्याय निवडल्याचं स्पष्ट केलं.
राघव चड्ढा यांनी दावा केला की हा निर्णय त्यांनी एकट्याने घेतलेला नाही. त्यांच्या सोबत आणखी सहा खासदारांनीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. “एक माणूस चुकीचा असू शकतो, दोन माणसं चुकीची असू शकतात. पण सात जण एकाच वेळी चुकीचे असू शकत नाहीत,” असं ते म्हणाले.
त्यांनी पक्षातील वातावरणावरही गंभीर आरोप केले. “जर ऑफिसचं वातावरण विषारी बनलं, तुम्हाला काम करु दिलं जात नसेल, तुम्हाला बोलू दिलं जात नसेल, तर तिथे काम करणं कठीण होतं. माझ्यासोबतही असंच होत होतं,” असा दावा त्यांनी केला.
तरीही, सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. “मी लोकांचे प्रश्न पूर्वीप्रमाणेच ताकदीने मांडत राहीन. फरक इतकाच असेल की आता त्या समस्यांवर उपाय शोधण्याची आणि ते प्रत्यक्षात आणण्याची संधी अधिक प्रभावीपणे मिळेल,” असं ते म्हणाले.
राघव चड्ढा यांच्या या निर्णयामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात याचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.