PM Kisan 22nd Installment Pudhari
अर्थभान

PM Kisan 22nd Installment: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार? अपडेट जाणून घ्या

PM Kisan 22nd Installment: PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता कधी येणार याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. 13 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असताना हा हप्ता जाहीर होण्याची चर्चा आहे.

Rahul Shelke

PM Kisan 22nd Installment Date: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून राबवली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये थेट जमा केले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपयांच्या स्वरूपात दिली जाते.

आतापर्यंत या योजनेच्या एकूण २१ हप्त्यांचे वितरण करण्यात आले असून आता शेतकरी २२व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. सुरुवातीला हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र तो अद्याप जमा झालेला नसल्यामुळे आता १३ मार्च २०२६ ही संभाव्य तारीख चर्चेत आली आहे.

१३ मार्चची तारीख चर्चेत का?

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील कोक्राझार येथे दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि घोषणांचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. अशा कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान अनेकदा सरकारी योजनांचे लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा करतात.

यामुळेच या कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. जर असे झाले, तर देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या (DBT) माध्यमातून २ हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. मात्र या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे येणार?

या योजनेनुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षातून तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. त्यामुळे २२व्या हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार आहेत.

हप्ता मिळण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात?

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ई-केवायसी (e-KYC) पूर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय जमिनीची पडताळणी पूर्ण केलेली असावी. तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे.

जर या प्रक्रिया पूर्ण झाल्या नसतील, तर संबंधित शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सरकारकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते.

शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळत असल्यामुळे ही योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक हप्त्याच्या घोषणेची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. आता २२व्या हप्त्याबाबत १३ मार्चची तारीख चर्चेत असली तरी याबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT