Ethanol Blending Petrol Pudhari
अर्थभान

Ethanol Petrol: आता पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल? सरकारच्या निर्णयामुळे जुन्या गाड्यांवर परिणाम होणार

Ethanol Blending Petrol: भारत सरकार पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिश्रण वाढवण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलावरील आयात खर्च कमी होण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ethanol Blending Petrol: भारत सरकार आता पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर भारताने आयात होणाऱ्या इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षाही अधिक इथेनॉल मिश्रण करण्याचा विचार सुरु आहे.

देशात अजूनही लाखो वाहनं अशी आहेत जी E20 म्हणजेच २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी पूर्णपणे तयार नाहीत. त्यामुळे या बदलाचा जुन्या वाहनांच्या इंजिनवर आणि त्यांच्या परफॉर्मन्सवर काय परिणाम होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

जुन्या वाहनांवर होऊ शकतो परिणाम

काही अहवालांनुसार, एप्रिल २०२३ पूर्वी तयार झालेल्या वाहनांवर जास्त इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा परिणाम दिसू शकतो. विशेषतः E10 साठी डिझाइन केलेली वाहनं जर E20 पेट्रोलवर चालवली गेली, तर त्यांच्या मायलेजमध्ये १ ते २ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

NITI Aayog च्या E20 रोडमॅप अहवालातही याबाबत संकेत देण्यात आले आहेत. जुन्या मॉडेलच्या वाहनांना या नव्या इंधन प्रणालीशी जुळवून घेण्यात अडचणी येऊ शकतात, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

या अहवालाशी संबंधित एका सदस्याने सांगितलं की, देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा निर्णय महत्त्वाचा असला तरी वाहन तंत्रज्ञानात आवश्यक बदल आणि योग्य धोरणं तयार करणंही तितकंच गरजेचं आहे. अन्यथा सामान्य वाहनधारकांना त्याचा फटका बसू शकतो.

सरकारचा दावा काय?

सरकारच्या मते, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे देशाला मोठा फायदा होत आहे. दरवर्षी जवळपास ४.५ कोटी बॅरल कच्च्या तेलाची बचत होत असून, आतापर्यंत सुमारे १.६५ लाख कोटी रुपयांचं परकीय चलन वाचल्याचा दावा सरकारने केला आहे.

सरकारने स्पष्ट केलं आहे की, एप्रिल २०२३ नंतर तयार झालेली बहुतांश नवीन वाहनं E20 इंधनासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे ही वाहनं २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर सहज चालू शकतात.

आयात खर्च कमी करण्यावर भर

भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलासाठी अन्य देशांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत जर इथेनॉलचा वापर वाढला, तर तेल आयात कमी होऊ शकते. यामुळे देशाचं इंपोर्ट बिल कमी होण्यास मदत होईल आणि जागतिक तेल बाजारातील चढ-उतारांचा परिणामही काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

याचा फायदा केवळ अर्थव्यवस्थेलाच नाही, तर सामान्य नागरिकांनाही होऊ शकतो. इथेनॉलसारख्या देशांतर्गत पर्यायांचा वापर वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि स्थानिक उद्योगांनाही मोठा आधार मिळू शकतो.

पुढचा मार्ग कसा असेल?

इथेनॉल मिश्रण वाढवण्याचा निर्णय भारतासाठी ऊर्जा स्वावलंबनाकडे जाणारं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. मात्र त्याचवेळी जुन्या वाहनांवर होणारा परिणाम, वाहन कंपन्यांची तयारी आणि ग्राहकांवर पडणारा आर्थिक भार या मुद्द्यांवर सरकारला काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT