1 March Rules Change: 1 मार्चपासून दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. रेल्वे तिकीट बुकिंगपासून डिजिटल पेमेंट, मेसेजिंग अॅप्स आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर आणि व्यवहारांवर होणार आहे.
रेल्वेने तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मार्चपासून जुने UTS अॅप बंद होणार आहे. यामुळे मोबाइलवरून जनरल तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्याची जुनी सिस्टीम बंद होणार आहे.
याऐवजी प्रवाशांना आता Rail One App या नव्या प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागेल. या अॅपवरून जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, आरक्षित सीट-बर्थ बुकिंग, ट्रेन स्टेटस आणि लाईव्ह लोकेशन यांसारख्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे वेगवेगळे अॅप वापरण्याची गरज राहणार नाही.
डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी 1 मार्चपासून UPI व्यवहारांमध्ये अतिरिक्त सुरक्षा लागू होणार आहे. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना केवळ UPI PIN पुरेसा राहणार नाही. त्यासोबत बायोमेट्रिक पडताळणी किंवा अतिरिक्त माहितीची आवश्यकता भासू शकते.
या बदलामुळे फसवणूक रोखण्यास मदत होईल, मात्र व्यवहार करताना थोडा अधिक वेळ लागू शकतो. तसेच काही सरकारी बँकांनी किमान शिल्लक (Minimum Balance) मोजण्याची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता मासिक सरासरी शिल्लक (Average Monthly Balance) महिनाभराच्या सरासरीवर आधारित मोजली जाईल. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
1 मार्चपासून मेसेजिंग अॅप्ससाठी ‘सिम बाइंडिंग’ नियम लागू होणार आहे. WhatsApp आणि Telegram सारखी अॅप्स आता सिम कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे.
जर मोबाईलमध्ये सिम कार्ड नसेल किंवा सिम इनॲक्टिव्ह असेल, तर संबंधित अॅप्स वापरता येणार नाहीत. या निर्णयाचा उद्देश फेक अकाउंट्स आणि गैरवापर कमी करणे हा आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर करतील. सकाळी सुमारे 6 वाजता नव्या दरांची घोषणा केली जाईल. दरवाढ होणार की दरकपात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. कारण स्वयंपाकघराचा खर्च थेट सिलेंडरच्या किमतीवर अवलंबून असतो.
1 मार्चपासून होणारे हे बदल नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करणारे आहेत. रेल्वे प्रवास, डिजिटल व्यवहार, मोबाईल अॅप्सचा वापर आणि घरगुती खर्च या सर्वांचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.