Vinod Khosla AI Prediction it BPO Jobs: कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI जगाची दिशा वेगाने बदलत आहे. ही केवळ तंत्रज्ञानाची लाट नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्था आणि रोजगार मार्केटला हादरवणारी क्रांती आहे, असा स्पष्ट इशारा तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज गुंतवणूकदार विनोद खोसला यांनी दिला आहे.
इंडिया AI समिटच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत खोसलांनी धक्कादायक भाकीत करत सांगितले की, “पुढील पाच वर्षांत IT सेवा आणि BPO क्षेत्र जवळपास पूर्णपणे बंद होईल.” एवढंच नाही, तर येत्या 15 वर्षांत बहुतेक कौशल्याधारित नोकऱ्या AI कडे जातील, असंही त्यांनी सांगितलं.
विनोद खोसला यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. IIT मधून शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी स्टार्टअप सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं. सुरुवातीला एक कंपनी उभी केली, नंतर सन मायक्रोसिस्टम्सची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी व्हेंचर कॅपिटल क्षेत्रात प्रवेश करत अनेक उद्योजकांना मदत केली.
खोसला सांगतात की, 1980 च्या दशकात स्टार्टअप सुरू करणं आजच्या इतकं सोपं नव्हतं. तेव्हा फक्त मोठ्या लोकांनाच भांडवल मिळायचं. “मी नियम, अडथळे, पूर्वग्रह याकडे दुर्लक्ष केलं आणि थेट कंपनी सुरू केली,” असं ते सांगतात.
खोसला यांच्या मते, इंटरनेट आणि स्मार्टफोनने जसं जग बदललं, त्यापेक्षा AI जास्त खोलवर परिणाम करणार आहे. ते सांगतात, “इंटरनेटमुळे Google आणि Amazonसारख्या कंपन्या उभ्या राहिल्या. मोबाइलमुळे Uber, Airbnb आले. पण AI थेट मानवी बुद्धिमत्तेची जागा घेत आहे. पुढील पाच वर्षांत AI बहुतेक कामांत माणसांपेक्षा चांगलं काम करेल.”
त्यांच्या मते, अकाउंटंट, डॉक्टर, ऑन्कोलॉजिस्ट, मानसिक आरोग्य तज्ज्ञ, आर्किटेक्ट, सेल्स प्रोफेशनल, हे सगळे रोल AI करू शकेल. सुरुवातीला AI कर्मचाऱ्यांचा ‘ज्युनिअर असिस्टंट’ असेल, पण नंतर तो पूर्ण ताबा घेईल.
यानंतर रोबोटिक्सची लाट येईल. स्वयंपाकघरातील भांडी धुण्यापासून ते शेतात काम करण्यापर्यंत बहुतेक शारीरिक श्रम रोबोट करतील. खोसला यांचा अंदाज आहे की, रोबोटिक मजुरी तासाला 2–3 डॉलर इतकी स्वस्त होईल. याचा परिणाम काय होईल? तर जागतिक पातळीवर उत्पादन खर्च घटेल, महागाई कमी होईल आणि 2035 पर्यंत ‘डिफ्लेशनरी इकॉनॉमी’ तयार होईल.
हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. खोसला सांगतात की, आज 22–25 वर्षांचा तरुण जेव्हा 40 च्या आसपास येईल, तेव्हा नोकऱ्या खूप कमी असतील. मात्र ते याला पूर्णतः नकारात्मक चित्र मानत नाहीत. त्यांच्या मते, AI मुळे प्रत्येक भारतीयाला जवळपास मोफत डॉक्टर, शिक्षक आणि कायदेशीर सल्ला मिळू शकतो. शिक्षण, आरोग्य, मनोरंजन हे सगळं स्वस्त होईल.
“जर वस्तू आणि सेवा अमर्याद प्रमाणात तयार होत असतील, तर सरकार किमान जीवनमान खूप उंचावू शकतं,” असं खोसला सांगतात. मात्र त्यासाठी सरकारला पुनर्वितरणाची (Redistribution) व्यवस्था तयार करावी लागेल.
खोसला यांनी भारताला थेट इशारा दिला आहे. ते म्हणतात, “पुढील पाच वर्षांत IT आणि BPO सेवा जवळपास संपतील.” आज भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर IT सेवांवर उभी आहे. लाखो तरुण या क्षेत्रात काम करतात. पण खोसलांच्या मते, भविष्यात भारताने IT नव्हे, तर AI-आधारित उत्पादने आणि सेवा निर्यात करायला हव्यात. भारताकडे 25 कोटी तरुण आहेत. त्यांनी जगाला AI उत्पादने विकली पाहिजेत. फारच कमी अर्थतज्ज्ञ याचा गांभीर्याने विचार करत आहेत. हा मोठा धोका आहे.”
AI क्षेत्रात सध्या अमेरिका आणि चीन आघाडीवर आहेत. पण खोसला यांच्या मते, भारताकडेही पुरेसं टॅलेंट आहे. ते ‘सॉव्हरिन AI’ म्हणजे देशांतर्गत AI मॉडेल्सवर भर देतात. संरक्षण, डेटा सुरक्षितता आणि स्थानिक गरजांसाठी भारताने स्वतःची AI प्रणाली उभारली पाहिजे. “जसं इंटरनेटवर Flipkart उभं राहिलं, तसंच AI वरही भारतीय कंपन्या उभ्या राहू शकतात,” असं ते सांगतात.
खोसला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणावरही टीका केली. H1B व्हिसावर निर्बंध घालणं हे चुकीचं असल्याचं ते सांगतात. त्यांच्या मते, अमेरिकेतील GDP वाढीपैकी मोठा भाग नवीन कल्पनांमधून येतो आणि त्या नवकल्पनांमागे स्थलांतरित अभियंते, डॉक्टर, उद्योजक आहेत. “कायदेशीर स्थलांतर देशासाठी फायदेशीर असतं. ट्रम्प यांनी कायदेशीर आणि बेकायदेशीर स्थलांतर यांची सरमिसळ केली आहे,” असं खोसला सांगतात.
AI मुळे जग वेगाने बदलत आहे. नोकऱ्या कमी होतील, पण सेवा स्वस्त होतील. भारतासाठी ही मोठी संधीही आहे आणि मोठा धोका देखील. जर भारत वेळेत AI-आधारित अर्थव्यवस्थेकडे वळला, तर तो जगात आघाडी घेऊ शकतो. नाहीतर पारंपरिक IT मॉडेल कोसळल्यावर मोठं रोजगार संकट उभं राहू शकतं.