Smartphone Price Hike Pudhari
अर्थभान

Smartphone Price Hike: स्वस्त मोबाईल मिळण्याचे दिवस संपले; स्मार्टफोनच्या किंमती 40 टक्के वाढल्या, काय आहे कारण?

Smartphone Price Hike: भारताच्या स्मार्टफोन बाजारात मोठी किंमतवाढ झाली असून काही मॉडेल्स 40% पर्यंत महागले आहेत. जागतिक तणावामुळे उत्पादन खर्च वाढल्याचा परिणाम झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Smartphone Price Hike in India: भारताचा स्मार्टफोन बाजार अडचणीत सापडला आहे. वाढत्या जागतिक तणावाचा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांचा थेट परिणाम आता ग्राहकांच्या खिशावर होताना दिसत आहे. देशातील प्रमुख स्मार्टफोन ब्रँड्सनी किंमतीत मोठी वाढ केल्यामुळे बाजारपेठेतील मागणीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Vivo, Samsung, Oppo यांसह Xiaomi, Realme आणि Nothing या ब्रँड्सनी त्यांच्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत तब्बल 40% पर्यंत वाढ केली आहे.

या वाढीमागे दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि दुसरे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साठी लागणाऱ्या मेमरी चिप्सची वाढती मागणी. AI क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनसाठी लागणाऱ्या चिप्सची कमतरता निर्माण झाली आहे.

भारतामध्ये स्मार्टफोन हा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स बाजार मानला जातो, ज्याची एकूण विक्री 43 अब्ज डॉलरपेक्षा जास्त (सुमारे 4 लाख कोटी) आहे. मात्र, कोरोनानंतर या बाजारात अपेक्षित वाढ झाली नाही. नवीन फीचर्सचा अभाव आणि बाजारातील अस्थिरता यामुळे ग्राहकांचा नवीन फोन खरेदी करण्याचा उत्साह कमी झाला आहे.

अशातच किंमती वाढल्यामुळे ग्राहक आणखी सावध झाले आहेत. महागाईमुळे आधीच इंधन आणि घरगुती गरजांच्या वस्तूंवरचा खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेकजण स्मार्टफोन खरेदी पुढे ढकलत आहेत.

किंमती वाढीचा परिणाम विविध सेगमेंटमध्ये दिसत आहे. उदाहरणार्थ, Vivo चा बजेट फोन ₹9,999 वरून ₹13,999 पर्यंत गेला आहे. Samsung ने आपल्या मिड-रेंज फोन्सच्या किंमतीत 30 ते 36% वाढ केली आहे, तर Oppo ने काही मॉडेल्सवर सरासरी ₹2,000 ची वाढ केली आहे. Xiaomi आणि Realme यांनीही त्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते, ही वाढ इथेच थांबणार नाही. मेमरी चिप्सच्या किंमतीत डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान 120% पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे स्मार्टफोन तयार करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून कंपन्या हा भार थेट ग्राहकांवर टाकत आहेत.

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशननुसार, ही वाढ कमी होणार नाही आणि पुढील काही महिन्यांत स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते.

याचा थेट परिणाम बाजारावर दिसू लागला आहे. स्मार्टफोन विक्रीत जवळपास 10% घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्राहक नवीन फोन खरेदी करण्याऐवजी सेकंड-हँड फोन किंवा दुरुस्तीचा पर्याय निवडताना दिसत आहेत.

एकूणच, वाढता खर्च, कमी मागणी आणि कंपन्यांमधील मार्जिनच्या संघर्षामुळे भारताचा स्मार्टफोन बाजार सध्या अडचणीत सापडला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या काळात हा बाजार आणखी मंदावण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT