IT Sector Crisis Pudhari
अर्थभान

IT Sector Crisis: AI आणि जागतिक मंदीमुळे हाहाकार; भारतीय आयटी क्षेत्राला मोठा फटका, नेमकं काय घडतयं?

India IT Sector Crisis: Infosys आणि HCL Technologies यांच्या कमकुवत निकालांमुळे भारतीय आयटी क्षेत्रावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

India IT Sector Crisis: इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज सारख्या भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांसमोर सध्या मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा झपाट्याने वाढणारा प्रभाव आणि जागतिक आर्थिक मंदीमुळे भारतीय आयटी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांत या क्षेत्राच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये तब्बल 115 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे.

भारतीय आयटी उद्योग सध्या दबावाखाली आहे. एका बाजूला जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे कंपन्या खर्च कमी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला AI मुळे पारंपरिक आयटी सेवा मॉडेल बदलू लागले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आयटी शेअर्सवर सतत विक्रीचा दबाव वाढताना दिसत आहे.

अलीकडेच Infosys ने अपेक्षेपेक्षा कमी वाढीचा अंदाज व्यक्त केला, तर HCL Technologies च्या नफ्यातही कमकुवत कामगिरी दिसून आली. या निकालांनंतर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अनेक ब्रोकरेज कंपन्यांनीही या क्षेत्रातील स्टॉक्सची रेटिंग कमी केली आहे.

भारतीय शेअर बाजारातील आयटी क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारा Nifty IT Index जून 2023 नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या चार महिन्यांत या क्षेत्राचं एकूण मार्केट कॅप सुमारे 115 अब्ज डॉलरने घटलं आहे. याचा परिणाम व्यापक बाजारावरही झाला आहे, कारण Nifty 50 मध्ये आयटी कंपन्यांचा वाटा जवळपास 10 टक्के आहे.

जागतिक स्तरावर वाढलेल्या अनिश्चिततेमुळे, विशेषतः इराणसंबंधित भू-राजकीय तणावामुळे अनेक कंपन्यांनी टेक्नॉलॉजीवरील खर्च कमी केला आहे. ग्राहक कंपन्या आता मोठे आणि दीर्घकालीन प्रोजेक्ट्स पुढे ढकलत आहेत आणि फक्त अत्यावश्यक खर्चावर लक्ष केंद्रित करत आहेत.

दरम्यान, AI मुळे आयटी क्षेत्रातील कामकाजाची पद्धत वेगाने बदलत आहे. अनेक पारंपरिक सेवा आता ऑटोमेशनकडे वळत आहेत. त्यामुळे कंपन्यांना आपली रणनीती बदलावी लागत आहे. Tata Consultancy Services (TCS) ने AI इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटरसाठी नवीन भागीदारी सुरू केली आहे, तर Infosys आपल्या सेवांमध्ये AI चा अधिक वापर करून खर्च कमी करण्याचा आणि ग्राहकांना अधिक मूल्य देण्याचा प्रयत्न करत आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती अजून काही काळ आव्हानात्मक राहू शकते. Bloomberg Intelligence चे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक अनुराग राणा यांनी सांगितलं की, आर्थिक अनिश्चितता आणि AI चा खरा फायदा किती होईल याबाबत अजून स्पष्ट चित्र नाही. त्यामुळे कंपन्या मोठे प्रकल्प पुढे ढकलत आहेत.

तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, कंपन्यांकडे पुढील काही महिन्यांबाबत स्पष्ट अंदाज नाही. त्यामुळे आयटी क्षेत्रात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सध्या अधिक सावध झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT