School Lunchbox Ideas
मुंबई: दुपारच्या जेवणानंतरचा तास सुरू होताच मुलांच्या वागणुकीत अनेकदा वेगवेगळे बदल दिसून येतात. काही विद्यार्थी वर्गात उत्साहाने उत्तरं देत असतात; तर याउलट, काही विद्यार्थ्यांना सुस्ती येते आणि शिक्षकांच्या नजरेतून वाचून मागच्या बाकावर डुलकी घेण्याची त्यांची इच्छा होते. पालकांमध्ये सहसा मुलांचा स्क्रीन टाईम, गुण आणि अभ्यासेतर उपक्रम यावर चर्चा होते. मात्र, मुलांच्या डब्यात काय दिले जात आहे, या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होते. मुलांच्या डब्यातील प्रत्येक घास त्यांचा मूड, ऊर्जा आणि एकाग्रता ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
एका जागतिक अहवालानुसार, ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स (उदा. जंक फूड, तेलकट पदार्थ) असलेल्या आहारामुळे मुलांची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि वर्तनावर नकारात्मक परिणाम होतो. लहान वयातील पोषक तत्वांची कमतरता मुलांच्या बौद्धिक विकासात अडथळा ठरू शकते. जास्त साखर असलेल्या पदार्थांमुळे शरीरात ऊर्जा अचानक वाढते आणि नंतर ती तितक्याच वेगाने कमी होते. यामुळे मुलांना दुपारनंतर प्रचंड थकवा जाणवतो. याउलट, तृणधान्ये, फळे आणि डाळींचा समावेश असलेला संतुलित आहार मुलांना दिवसभर सक्रिय ठेवतो.
सकाळची घाईगडबड, कामाचा व्याप आणि मुलांचे हट्ट यांमुळे रोज काय नवीन डबा द्यायचा, हा पालकांसमोर मोठा प्रश्न असतो. यावर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी काही सोपे उपाय सुचवले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच पौष्टिक भाज्या आणि फळांची खरेदी करून ठेवावी. डबा तयार करताना मुलांची मदत घ्यावी. यामुळे त्यांना आहाराचे महत्त्व समजेल आणि ते डबा आवडीने संपवतील. तसेच वाढत्या वयाच्या मुलांसाठी आवश्यक असणारी तृणधान्ये, प्रथिने, भाज्या आणि फळांचे अचूक प्रमाण राखावे.
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतीवर जितकी चर्चा होते, तितकीच किंबहुना त्याहून अधिक चर्चा मुलांच्या पोषणावर होणे गरजेचे आहे. शाळा आणि पालक यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास मुलांच्या आरोग्याशी तडजोड न करता त्यांना चविष्ट आणि पौष्टिक आहार देणे सहज शक्य आहे, ज्यामुळे त्यांचे शालेय जीवन अधिक समृद्ध होईल.