२०५० सालापर्यंत भारतातील लठ्ठपणाचे प्रमाण खूप वाढणार
लठ्ठपणात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा असेल जास्त
लहान मुलांमध्ये लठ्ठपणा सर्वात चिंतेची बाब
१९९० च्या तुलनेत २०२२ पर्यंत मुला-मुलींमधील वाढलेला लठ्ठपणा भयावह
सध्या भारतात सुमारे १ कोटी २५ लाख मुले आणि तरुण करतायत लठ्ठपणाच्या समस्येचा सामना
Obesity Health Alert
नवी दिल्ली : आजच्या धावपळीच्या काळात एका जागी बसून काम करणे आणि जंक फूड खाण्यामुळे वजन वाढते, हे आपल्याला माहित आहेच. लठ्ठपणा ही केवळ चुकीच्या जीवशैलीमुळे झालेली समस्या नाही, तर तो एक गंभीर आणि जुनाट आजार आहे. तो सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. हा शरीरातील अंतर्गत बिघाडामुळे होणारा आजार असून, यामुळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळे येतात आणि आरोग्याचे मोठे नुकसान होते. लठ्ठपणाचे निदान करण्यासाठी ठराविक निकष आहेत. त्यामुळे, केवळ स्वतः प्रयत्न न करता यावर योग्य डॉक्टरी उपचार आणि दीर्घकाळ काळजी घेणे आवश्यक आहे, असे मधुमेहावर संशोधन करणारे तज्ज्ञ डॉ. जोथीदेव केशवदेव यांनी स्पष्ट केले आहे.
'इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, तिरुवनंतपुरम येथील महिना चार लाख रुपये पगार असणार्या २५ वर्षीय आयटी इंजिनिअरला वर्क फॉर्म होमचे काम मिळाले. आता काम करत असताना तणाव कमी करण्यासाठी खाणे हाच एकमेव पर्यात होता. अतिकामाबरोबर त्याचे अतिखाणे झाले. त्या दृष्टचक्रात त्याच्या वजनात प्रचंड वाढ झाली. वजन तब्बल १५० किलो झाले. वयाच्या मधुमेह आणि उच्च रक्तदाब झाला, तेव्हा त्याने संशोधन मधुमेहतज्ज्ञ डॉ. जोथीदेव केशवदेव यांचा सल्ला घेतला.
डॉ. जोथीदेव केशवदेव म्हणतात की, लठ्ठपणा हा आता आधुनिक जीवनशैलीचा विकार नाही; तो सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. लठ्ठपणा हा एक जुनाट आजार मानला पाहिजे. हा शरीरातील अंतर्गत बिघाडामुळे होणारा आजार असून, यामुळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळे येतात. आता लठ्ठपणा कमी करण्यासाठी केवळ जीवनशैलीत बदल करुन चालणार नाहीत तर वैद्यकीय उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापन आवश्यक आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. जोथीदेव यांच्या मते, आपल्या देशात लठ्ठपणाकडे पाहण्याची पद्धत बदलली पाहिजे. लठ्ठपणाला फक्त 'चुकीची जीवनशैली' न मानता, त्याकडे एक 'जुनाट आजार' म्हणून पाहिले पाहिजे. जेव्हा आपण याला आजार मानू, तेव्हा जाड व्यक्तीकडे पाहण्याचा लोकांचा चुकीचा दृष्टिकोन बदलेल आणि त्यांना योग्य उपचार मिळण्यास मदत होईल. यासाठी देशात नवीन आरोग्य नियम आणि धोरणे आखण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
भारतात वाढणाऱ्या लठ्ठपणाबद्दल तिरुअनंतपुरम येथीलर जोथीदेव डायबिटीज रिसर्च सेंटर, एम्स, दिल्ली; ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर; फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्राम आदी संस्थांनी केलेल्या अध्ययानंतर एक अहवाल जारी केला आहे. यामध्ये नमूद केलेले मुद्दे खालीलप्रमाणे....
लठ्ठपणा हा केवळ अनुवांशिक (पिढ्यानपिढ्या चालत आलेला) नसून तो चयापचय शक्ती, मेंदूतील मज्जासंस्था आणि सभोवतालचे वातावरण यांसारख्या अनेक गुंतागुंतीच्या कारणांमुळे होणारा आजार आहे.
शरीरातील वाढलेल्या चरबीच्या पेशींमुळे सूज निर्माण होते. यामुळे मधूमेह, हृदयविकार आणि उच्च कोलेस्ट्रॉल फॅटी लिव्हर (यकृतामध्ये चरबी जमा होणे) आदी त्रास होतो.
२०५० सालापर्यंत भारतातील लठ्ठपणाचे प्रमाण खूप वाढणार आहे. यात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असेल.
२०५० पर्यंत देशात १७.४% महिला लठ्ठ असतील, तर हीच टक्केवारी पुरुषांमध्ये १२.१ इतकी असेल.
महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक असण्याची शक्यता आहे.
लठ्ठपणामुळे चयापचयात होणाऱ्या बदलांमुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
स्वादुपिंड आणि मूत्राशय कर्करोगाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे.
कोलन आणि मलाशय यांच्या कर्करोगाचा धोका वाढतो आहे.
शरीरातील अति चरबीमुळे इस्ट्रोजेन या संप्रेरकाची पातळी वाढते, ज्यामुळे महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका निर्माण होत आहे.
सर्वात चिंतेची बाब लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण खूप वेगवान आहे.
१९९० च्या तुलनेत २०२२ पर्यंत मुला-मुलींमधील लठ्ठपणा कैक पटीने वाढला आहे.
सध्या भारतात सुमारे १ कोटी २५ लाख मुले आणि तरुण लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत आहेत.
वजन वाढण्यामागे मुख्य कारणांपैकी एक म्हणजे केवळ चवीसाठी खाणे याला अन्नाचा वास, एखादा पदार्थ दिसणे किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भूक नसतानाही अन्न ग्रहण केले जाते तेव्हा वजन वाढते. सध्याच्या धावपळीच्या जगण्यात तणावपूर्ण जगण्यात च पुरेशी झोप न मिळाल्यामुळे मनाला आनंद मिळवण्याचा 'अन्न' हा सर्वात सोपा मार्ग वाटतो.आजवर अनेक अभ्यासांतून असे स्पष्ट झाले आहे की, मानसिक दडपण किंवा नैराश्यात असताना जास्त खाणे हे थेट लठ्ठपणाशी जोडलेले आहे.हॉटेलिंगची संस्कृती, फूड डिलिव्हरी ॲप्स आणि सोशल मीडियामुळे चविष्ट अन्न मिळवणे आता खूप सोपे झाले आहे. त्यामुळे आपला मूड चांगला करण्यासाठी अनेक जण बाहेरील अन्नपदार्थांना पसंती देतात हेही वजन वाढीचे कारणआहे. जर एखादी व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण न ठेवता अशा प्रकारे अन्नावर अवलंबून राहिली, तर पुढील १० वर्षांत तिला लठ्ठपणा येण्याची खात्री असते. असा अंदाज आहे की, लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांवरील खर्च २०६० पर्यंत १७ पटीने वाढणार आहे.
डॉ. जोथीदेव यांच्या यांनी स्पष्ट केल्या प्रमाणे लठ्ठपणावर मात करण्यासाठी सरकारी पातळीवर आणि जीवनशैलीत मोठे बदल होणे आवश्यक आहे. त्यांनी सूचवलेले उपाय खालील प्रमाणे...
लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी सध्या कोणतेही ठराविक नियम (Code) नाहीत. ते असणे गरजेचे आहे.
प्रत्येक सरकारी रुग्णालयात लठ्ठपणासाठी स्वतंत्र 'स्पेशल क्लिनिक' असावे.
लठ्ठपणा हा आजार मानून त्याच्या उपचारांचा खर्च आरोग्य विम्यात समाविष्ट केला पाहिजे.
मुलांच्या आहारात आणि वागण्यात बदल घडवण्यासाठी शाळांमध्येच मार्गदर्शन व्हायला हवे.
देशातील अन्नातील कर्बोदकांवर जास्त अवलंबून आहोत, ते कमी करणे गरजेचे आहे.
जेवणात योग्य अंतर ठेवणे आणि पोट भरल्याची जाणीव झाल्यावर खाणे थांबवणे आता केवळ आवड राहिली नसून ती गरज बनली आहे.
केवळ चालणे पुरेसे नाही, तर शरीराची ताकद वाढवणारे व्यायाम आवश्यक आहेत.
सलग तासनतास बसून राहण्यापेक्षा, दर ३० मिनिटांनी थोडा वेळ उभे राहणे किंवा चालणे कामाच्या संस्कृतीचा भाग असावा.
रजोनिवृत्तीच्या आधीच्या काळात महिलांचे वजन हार्मोन्समुळे वाढते. अशा वेळी त्यांनी आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.