Latest

Kuno Park: सहा चित्त्यांच्या मृत्यूनंतर सरकार जागे; ११ सदस्यीय समितीची स्थापना

अविनाश सुतार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात चित्त्यांचा अधिवास तयार व्हावा, यासाठी केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न चालविले असले तरी मागील काही काळात सहा चित्त्यांचा मृत्यू झाल्याने या मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आता खडबडून जागे झाले आहे. सदर मोहिमेचा आढावा घेण्यासह त्यावर नजर ठेवण्यासाठी सरकारने 11 सदस्यीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे.
ग्लोबल टायगर फोरमचे महासंचालक राजेश गोपाल यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. गेल्या काही काळात तीन प्रौढ चित्त्यांसह तीन लहान पिल्लांचा मृत्यू झाला होता. नामीबिया येथून आणलेले हे चित्ते मध्य प्रदेशातील कुन्हो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. सहा चित्त्यांच्या मृत्यूमुळे देशातले वातावरण तर या चित्त्यांना मानवत नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चित्ता अधिवास मोहिमेचा आढावा घेण्यासाठी बनविण्यात आलेल्या समितीमध्ये राजस्थानचे वन खात्याचे माजी प्रमुख आर. एन. मल्होत्रा, वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूटचे माजी संचालक पी. आर. सिन्हा, एपीसीसीएफचे माजी संचालक एच. एस. नेगी आदींचा समावेश आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये ज्वाला नावाच्या मादी चित्त्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मरण पावलेल्या चित्त्यांची एकूण संख्या पाच झाली आहे. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या दोन बिबट्यांचा समावेश आहे. चित्याच्या या पिलांचा मृत्यू अशक्तपणामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे झाला असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. (Kuno Park)

वनविभागाने प्रेस नोट जारी करत म्हटले आहे की, "मादी चित्ता ज्वालाच्या निगराणी पथकाला ती बछड्यांसह एका ठिकाणी बसलेली आढळली. काही काळाने तिच्या दोन पिल्लांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. निरीक्षण पथकाने पशुवैद्यकांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Kuno Park)

अशक्तपणामुळेच बछड्यांचा मृत्यू झाल्याचे दिसत असल्याचे वनविभागाने सांगितले. चित्ता ज्वाला सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आली होती. तिला पूर्वी सिया या नावाने ओळखले जात होते. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तिने चार बछड्यांना जन्म दिला होता. (Kuno Park)

नामिबियातील चित्त्यांपैकी एक असलेल्या साशाचा 27 मार्चरोजी मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला होता. तर दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या उदय या चित्ताचा 23 एप्रिलरोजी मृत्यू झाला होता. दक्षिण आफ्रिकेतून आणलेली दक्षा ही मादी चित्ता जखमी होवून तिचा मृत्यू झाला. भारतातील वाढते तापमान हे या चित्यांच्या मृत्यूमागे कारण असल्याचेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT