नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोना महारोगराईची लाट ओसरली आहे. हळूहळू दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या देखील कमी होत आहे. अशात गेल्या ७१५ दिवसांनी देशात एक हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधित आढळले आहेत. रविवारी दिवसभरात केवळ ९१३ कोरोनाबाधितांची भर पडली. तर,१३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान १ हजार ३१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशातील ४ कोटी २४ लाख ९५ हजार ८९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात मात केली. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६% आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.२९% नोंदवण्यात आला.
देशात आतापर्यंत ५ लाख २१ हजार ३५८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत १८४.७० कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८५ कोटी २१ लाख ४४ हजार ४९४ डोस पैकी १५ कोटी ५५ लाख ७२६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७९ कोटी १० लाख ७९ हजार ७०६ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ३ कोटी १४ लाख ८२३ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.