बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : स्मशानभूमीत जाण्यासाठी जागा नसल्याने संतप्त नातेवाईकांनी सोमवारी (दि.२७) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह घेऊनच धरणे आंदोलन केले. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलीसही अवाक् झाले. सौदत्ती तालुक्यातील एणगी गावातील अब्दुल खादर या मुस्लिम कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला. या गावात हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही. अनेकवेळा मार्गाची मागणी करूनही कार्यवाही झाली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
आज सकाळी खादर यांचा मृत्यू झाला. मात्र, मृतदेह नेण्यासाठी स्मशानभूमीला रस्ता नसल्याने वैतागलेल्या नागरिकांनी शेवटी मृतदेह वाहनात ठेवून थेट बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेऊनच धरणे आंदोलनाला प्रारंभ केला. त्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नितेश पाटील तत्काळ घटनास्थळी आले.
जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लवकरच स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता करुन देण्याचे आश्वासन दिले. घटनास्थळी आलेल्या काही शेतकरी नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.
अखेर अधिकारी आणि पोलिसांबरोबर झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थांनी माघार घेतली. आणि तत्काळ रस्ता करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानंतर मृतदेह वाहनात घालून ग्रामस्थ आपल्या गावाकडे रवाना झाले.
हेही वाचा