कर्नाटक सरकारने हमारे बारह बंदी घातली आहे.  
बेळगाव

Hamare Baarah Movie : कर्नाटक सरकारने घातली ‘हमारे बारह’ चित्रपटावर बंदी; जाणून घ्या कारणे….

करण शिंदे

पुढारी, ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून अन्नू कपूरचा 'हमारे बारह' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अन्नू कपूर प्रमुख अभिनेता आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. कर्नाटक सिनेमा (नियमन) कायदा, 1964 अंतर्गत हा निर्णय घेतला गेला आहे. या चित्रपटामुळे जातीय ताण-तणाव वाढू शकतो, असे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान पुढील दोन आठवड्यापर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी असावी. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत चर्चा केली जाईल.

काही अल्पसंख्याक संघटनांनी आणि शिष्टमंडळांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आक्षेप नोंदविला होता. कमल चंद्रा दिग्दर्शित चित्रपटात अन्नू कपूर यांच्याबरोबर मनोज जोशी, परितोष त्रिपाठी आणि पार्थ संथन असे इतर कलाकार आहेत. बुधवारी (दि.5) मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला 14 जून 2024 पर्यंत स्थगिती दिली आहे. पुण्यातील एका व्यक्तीने या संदर्भात याचिका दाखल केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. हा चित्रपट 7 जून रोजी प्रदर्शित होणार होता.

अनेक संघटनांनी नोंदवला आक्षेप

एएनआयच्या वृत्तानुसार, कर्नाटक राज्यात दोन आठवड्यांसाठी किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. अनेक संघटनांनी घेतलेले आक्षेप लक्षात घेऊन आणि ट्रेलर पाहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. राज्यात जातीय तणाव निर्माण होऊ नये म्हणून या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, असेही म्हटले आहे.

हमारे बारह वादात का आहे ?

रिलीज होण्यापूर्वीच 'हमारे बारह'ला प्रेक्षकांच्या तीव्र नाराजीला सामोरे जावे लागत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 'असंस्कृत' आणि 'सांप्रदायिक प्रचार' हे घटक असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. 'हमारे बारह'चा ट्रेलर अस्वस्थ करणारा आहे. हा चित्रपट लोकांच्या मनात 'विष' टाकू शकतो, असा तर्क अनेकांनी व्यक्त केला आहे. वाढत्या वादाच्या दरम्यान, 30 मे रोजी ट्रेलर रिलीज झाला होता. आता अचानक चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला.

अन्नू कपूर म्हणाले, मी नास्तिक आहे…

अभिनेता अन्नू कपूरने आपल्या चित्रपटावर टीका करणाऱ्यांना धारेवर धरले आहे. न्यूज 18 सोबत बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकजण चित्रपट पाहण्याआधीच त्याचा न्याय करण्यास तत्पर असतो. लोकांनी आधी हा चित्रपट पाहावा आणि नंतर त्याबद्दल मत बनवावे, असे आवाहन त्यांनी केले. पुढे ते म्हणाले की, वैयक्तिकरित्या मी नास्तिक आहे. माझे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना असे वाटले की मीच योग्य व्यक्ती आहे. जो पडद्यावर त्यांचे व्हिजन अंमलात आणू शकेन. त्यामुळे मी माझ्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. चित्रपट हे एक काल्पनिक जग आहे. तिथे माझी कलाकार म्हणून निवड केली जाते आणि माझे काम माझ्या कलेला न्याय देणे आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT