[author title="काशिनाथ सुळकुडे" image="http://"][/author]
चिकोडी: कर्ज परतफेड करण्यासाठी उशिरा झाल्याने पत्नी व मुलाला घरामध्ये कोंडून घातल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्याने जीवन संपविले. ही घटना हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना यमकनमरडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाच महिन्यांपूर्वी राजू खोतगी यांने उदरनिर्वाहासाठी सिद्धवा यांच्याकडून दीड लाखाचे कर्ज घेतले होते. या कर्जावर प्रत्येक महिन्याला दहा टक्के व्याज देखील ते भरत होते.
दरम्यान, सिद्धवा यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक राजू यांना घरी बोलावून कर्ज परत देण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे त्यांनी कर्ज परतफेड करण्यासाठी दोन दिवसांची वेळ मागून घेतली. परंतु, यास नकार देत कर्ज परत फेड होईपर्यंत मुलग्याला घरात सोडून जाण्यास सिद्धवा यांनी राजूला सांगितले होते.
एके दिवशी सायंकाळ झाली तरी आपल्या मुलाला न सोडल्याने सिद्धवाच्या घरी राजू व त्याची पत्नी दुर्गवा गेले. त्यावेळी मुलगा बसवराज याला सोडून देऊन राजू खोतगी व दुर्गवांना घरात बसून घेतले. दुसऱ्या दिवशी राजू याला सोडून बसवराज व दुर्गवा या दोघांना घरात कोंडून घातले. त्यामुळे नाराज होऊन घरी आलेले राजू यांने विष प्राशन करून जीवन संपविले.
उदरनिर्वाहासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी उशीर झाल्याने अशाप्रकारे अमानुषपणे वर्तणूक केली. सिद्धवाने केलेल्या या अन्यायाविरुद्ध तत्काळ तक्रार दाखल करून घेतली नाही, असा आरोप राजूच्या कुटुंबियांनी पोलिसांवर केला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा