बेळगाव ः निषेध पत्रक दाखवताना गोपीनाथ पलनियप्पन, आमदार राजू सेट, विनय नावलगट्टी, आमदार बाबासाहेब पाटील, विश्वास वैद्य, लक्ष्मण चिंगळे, वीरकुमार पाटील, राहुल जारकिहोळी, मृणाल हेब्बाळकर आदी मान्यवर. 
बेळगाव

Congress Protest : ही तर गांधीजींची दुसऱ्यांदा हत्या

‌‘व्हीबीजी रामजी‌’ नावाविरोधात काँग्रेसचे उपोषण

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव ः आम्ही शांतता आणि सौहार्द पाळत आहोत. केंद्र सरकार महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) बदलत आहे आणि द्वेषाचे राजकारण करत आहे. नावात बदल करून गांधीजींची दुसऱ्यांदा हत्या झाली आहे; पण नवीन कायदा रद्द होईपर्यंत संघर्ष थांबणार नाही. हा संघर्ष संपूर्ण देशात चळवळीचे रूप धारण करेल, असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रभारी सचिव गोपीनाथ पलनियप्पन यांनी सांगितले.

मनरेगा सुधारणा विधेयक आणि तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी रविवारी (दि. 11) जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या आवारात एआयसीसीचे प्रभारी सचिव गोपीनाथ पलनियप्पन यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. केंद्र सरकारचे नवीन विधेयक ‌‘व्हीबीजी रामजी‌’ हे केवळ नाव बदलत नाही तर योजनेच्या कल्पनेलाच उलथवून टाकत आहे. त्यामुळे ही योजना पूर्वीप्रमाणेच मनरेगाच्या नावाने सुरू ठेवावी. योजनेतून राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नाव काढून टाकून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या त्यांच्या स्वप्नाला आदरांजली वाहण्यात येत आहे. मनरेगामध्ये ग्रामपंचायतींना प्रकल्प निवडण्याचा अधिकार होता. पण आता केंद्राने गैरवापर करण्याचे काम हाती घेतले आहे. सरकारने गरिबांना मारू नये तर लोकांच्या हिताचे रक्षण करावे, असे ते म्हणाले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी म्हणाले, ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या मनरेगाला वाचवण्याचा प्रयत्न करूया. भाजप महात्मा गांधींचे नाव पुसण्याचा प्रयत्न करत आहे. जग गांधींपुढे नतमस्तक आहे, परंतु केंद्र सरकार त्यांचा अनादर करत आहे. योजनेचे स्वरूप बदलून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार ग्रामीण भागातील गरिबांचे अन्न हिसकावून घेत आहे. आमदार राजू सेट यांनी, मोदींना महात्मा गांधी कोण आहेत, हे माहीत नसावेत म्हणूनच केंद्र सरकार देश वाचवणाऱ्यांचे नाव पुसून टाकत आहे. योजना बदलण्यासाठी लोकांची संमती घेतली पाहिजे, ती सोडून भाजप त्यांना हवी तशी योजना राबवत आहे. सरकारे गरिबांसाठी अनुकूल असावीत, असे सांगितले.

आमदार महांतेश कौजलगी, आमदार बाबासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, आमदार विश्वास वैद्य यांनीही मनोगत व्यक्त करून मनरेगा नाव बदलण्याला विरोध केला. माजी मंत्री वीरकुमार पाटील, पंच हमी योजना अंमलबजावणी समिती अध्यक्ष विनय नावलगट्टी, सुनील हणमण्णावर, केपीसीसी सदस्य सुधाकर कृष्णा, युवराज गवळी, काडा अध्यक्ष युवराज कदम, माजी आमदार श्याम घाटगे, कार्तिक पाटील, अनंतकुमार ब्याकोड आदी यावेळी उपस्थित होते.

गरिबांच्या पोटावर पाय

काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी काँग्रेसने गरिबांच्या हितासाठी ‌‘मनरेगा‌’ लागू केली. मात्र, भाजप डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्वप्नातील प्रकल्प पुसण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आमच्या हृदयात भगवान रामाची पूजा करतो; पण आम्ही कधीही राजकीयदृष्ट्या त्याचा वापर केला नाही. भाजपची मानसिकता गरिबांच्या पोटावर पाय आणण्याची आहे, असे सांंगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT