खानापूर : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्राम पंचायत हद्दीतील सुरल (सुर्ल) येथील खानापूर तालुक्याच्या सीमेवरील बाराजणांच्या धबधब्यात बेळगाव येथील २० वर्षीय तरूण बुडाल्याची घटना रविवारी (दि.२८) घडली. आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) असे या तरूणाचे नाव असून तो मित्रांसमवेत पिकनीकसाठी गेला होता. सायंकाळपर्यंत त्याचा धबधब्याच्या कोंडीत शोध घेण्यात आला, मात्र संततधार पावसामुळे शोधकार्यात आडथळा येत असल्याने रात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.
मागील आठवड्यात गोव्याच्या म्हादई अभयारण्यात प्रवेश करणाऱ्या खानापूरच्या आठ तरूणांवर कारवाई करण्यात आली होती. तरीही म्हादई अभयारण्यातील धबधब्यांवर बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील पर्यटक गर्दी करीत आहेत. काल बेळगाव परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक बाराजणांच्या धबधब्यावर गेले होते. अदित्य हा देखील त्याच्या मित्रांसमवेत पिकनीकसाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, ते अपयशी ठरले.
तात्काळ या घटनेची माहिती वाळपई पोलिसांना देण्यात आली. म्हादई अभयारण्याचे कर्मचारी, अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. घाट परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शोधकार्यात वारंवार अडथळा येत होता. त्यामुळे शोध कार्य थांबविण्यात आले होते. म्हादई अभयारण्यात ठिकठिकाणी शिकार प्रतिबंधक पथके कार्यरत असली तरी पर्यटक कर्मचाऱ्यांना न जुमानता नजर चुकवून धबधब्यांवर जात आहेत. यापुढील काळात असे करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाईचे निर्देश वनखात्याने दिले आहेत.
सोमवारी शोधकार्य सुरू
आदित्य हा मुळचा ओडिशा येथील असून सध्या त्याचे कुटुंब बेळगावात वास्तव्यास आहे. त्याचे वडील दीपककुमार हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. घटनेची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. आज सोमवारी (दि.२९) सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात आले आहे.