पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Vacancy : बीसीसीआयमध्ये आता काही जागा रीक्त असल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवरर ही माहिती दिली आहे. बीसीसीआयमध्ये कोणत्या पदांसाठी भर्ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी अटीन व नियम काय असतील, याची माहिती आता समोर आली आहे.
निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून ही जागा रिक्त आहे. सध्याच्या समितीत सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला, श्रीधरन शरथ, शिव सुंदर दास हे चार सदस्य आहेत. दास हे सध्या तात्पुरती अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. (BCCI Vacancy)
एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय संघातील खेळाडूंबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर चेतन शर्मा यांनी फेब्रुवारीत राजीनामा दिला होता. त्यामुळे आता ते पद रीक्त आहे. बीसीसीआयला ३० जूनपर्यंत हे पद भरायचे आहे, त्यामुळे बीसीसीआयने सोशल मीडियावर आता याबाबतची सर्व माहिती दिली आहे. त्यानुसार निवड समिती सदस्य हा किमान ७ कसोटी सामने किंवा ३० प्रथम श्रेणीचे सामने, १० आंतरराष्ट्रीय वन-डे सामने किंवा २० प्रथम श्रेणीचे सामने खेळलेला असावा. तसेच या व्यक्तीला देशभरातील क्रिकेट पाहण्यासाठी फिरावे लागेल. जिथे बीसीसीआयच्या स्पर्धा होतील, तिथे निवड समितीमधील व्यक्तीला जावे लागेल आणि भारतीय संघाची निवड करावी लागेल, अशी ही अट घालण्यात आली आहे. अर्ज केलेल्या उमेदवाराने निवृत्ती जाहीर करून ५ वर्षांचा कालावधी उलटलेला असणे बंधनकारक करण्यात आळे आहे. (BCCI Vacancy)
टी-ट्वेंटी विश्वचषकातील भारताच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवीन समिती स्थापन करण्यात आली, तेव्हा चेतन शर्मा यांनी पुन्हा अर्ज केला होता. त्यात त्यांची फेरनिवड झाली. मात्र, स्टिंग ऑपरेशननंतर भारतीय संघातील बहुतांश सदस्य त्यांच्या विरोधात गेले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.