जळगाव : गुलाबराव पाटील यांनी दुसऱ्या जातीतील नेतृत्व पुढे येऊ दिले नाही. त्यांनी रावसाहेब पाटलांना शिव्या दिल्या, पी. एम. पाटलांचे तिकिट कापले, सुरेशनाना चौधरींना त्रास दिला, गुलाबराव वाघ यांना पुढे जाऊ दिले नाही. तर अलीकडेच शरद कोळी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. माझ्या मुलावर देखील विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातही ते मराठा समाजाचा खूपच द्वेष करतात. त्यांनीच जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेतृत्व संपविले !" असा गंभीर आरोप शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रमेश माणिक पाटील यांनी केला.
धरणगाव येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जाहीर सभा झाली. यावेळी शिवसेना नेत्यांनी बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. या सभेत रमेश पाटील यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच रमेश माणिक पाटील यांना आपण जन्म दिला असल्याचे सांगत त्यांची खिल्ली उडविली होती. याची जबरदस्त परतफेड रमेश पाटील यांनी धरणगावच्या सभेत केली.
"ज्या सुरेशनाना चौधरी यांच्या पाया पडून आपण पुढे गेलेत, ज्या नानांनी पैशांसह आपल्याला सर्व मदत केली, ज्या श्रीजी जिनींगमध्ये आपली कारकिर्द घडली, त्याच सुरेशनानांच्या धंद्यावर आपण उठले. यातून हजारो शेतकरी आणि शेतमजुरांचे आयुष्य आपण उद्धवस्त करण्यासाठी निघाले. सुरेशनाना नसते तर आपण एकदा तरी आमदार बनले असते का? याची जाणीव ठेवा… माझा बाप काढला तर खबरदार..!" अशा शब्दांमध्ये आज माजी नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी पालकमंत्र्यांवर घणाघाती टीका केली.
निलेश चौधरी यांनी पालकमंत्र्यांची धुलाई करतांना भूतकाळातील दाखले दिले. १९९५ पासून आपले वडील शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. त्यांना दोनदा नगराध्यक्षपद तर एकदा एमएलसीमध्ये डावलले. "सुरेशनाना नसते तर तुम्ही एकदा तरी आमदार बनले असते का?" असा सवाल विचारत, "तुम्हाला नानांनी जन्माला घातले असे वाटत नाही का?" असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर, नानांनी आता आपल्याला दोनच मुले आहे असे समजावे असे सांगत निकराच्या लढाईचे संकेत देखील दिलेत.