पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात यापूर्वीही अशा घटना सातत्याने होत असल्याचे दिसून आलेले आहे. अशा घटनांचा संबंध कुठे तरी हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीशी संबंधीत असतो. हवामान बदलामुळे जगभरात अशा तीव्र हवामानाच्या घटना वाढत जातील, या इशारा संशोधकांनी पूर्वीच दिलेला आहे.
महाराष्ट्रातील ३६ पैकी ११ जिल्ह्यांना अशा प्रकारच्या तीव्र हवामानाच्या घटनांना जास्त प्रमाणात सामोरे जावे लागेल, असे संशोधनातून स्पष्ट झालेले आहे. यासंदर्भातील रिसर्च पेपर Research Gate या साईटवर उपलब्ध आहे.. विशेष म्हणजे या ११ जिल्ह्यांत राज्यातील ४० टक्के शेतजमीन आहे. याचा विचार केला तर याचा किती राज्यातील शेतीला हवामान बदलाचा किती मोठा फटका बसेल हे लक्षात येते.
'Socio-economic vulnerability to climate change – Index development and mapping for districts in Maharashtra' हे संशोधन Indian Council of Agriculture Research आणि National Dairy Research Institute या संस्थांनी केले आहे. चैतन्य अढाव यांनी हे संशोधन केले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसेल, तर त्यानंतर बुलढाणा, बीड, जलना, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड, कोला, अमरावती आणि वाशीम या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यांना वादळ, पूर, दुष्काळ, पावसातील बदल, तापमान वाढ अशा प्रकारच्या घटनांचा सामना करावा लागेल.
धुळे, जळगाव, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना मध्यम स्वरूपाचा फटका बसेल, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
ज्वारी, भात, गहू, कापूस रागी, काजू, नाचणी अशा पिकांना हवामान बदलाचा जास्त फटका बसेल. पालघर, ठाणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यांना तुलनेत कमी फटका बसेल, असे या संशोधनात म्हटले आहे.
४४ मानकांचा अभ्यास करून हे संशोधन मांडण्यात आले आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडिओ : अद्भूत पश्चिम घाट