

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काहीही बोलले असतील, त्यांच्या त्या आजच्या भावना आहेत, पण पवार कुटुंब आतापर्यंत एकत्र राहलेले आहे. त्यामुळे आज ना उद्या त्यांचे मनपरिवर्तन नक्की होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेला शरद पवार टाळू शकणार नाहीत. अजित पवार यांच्या भूमिकेसोबतच शरद पवार येतील, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.२८) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलून उद्धव ठाकरे त्यांची उरलेली उंची कमी करीत आहेत. त्यांचे रोज अध:पतन होत आहे, अशी टीका बावनकुळे यांनी यावेळी केली. उलट देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेत आदर आहे, तो सतत वाढत आहे, असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासात नोंद होईल, असा महाराष्ट्राचा सक्षम मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी नवी उंची गाठली आहे. उद्धव ठाकरे यांनाही ती संधी मिळाली होती. परंतु ते त्यांची बरोबरी करू शकले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भावासारखी सांभाळले, याचा मी साक्षीदार आहे. सरकार व पद गेल्यामुळे त्याचे लोक त्यांना सोडून जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बावचळेल्या व उद्विग्न मन:स्थितीत आहेत. महाराष्ट्रात शांतता राहावी, असे आम्हाला वाटते. परंतु, जर तुम्ही मर्यादा ओलांडली, तर त्याचे पडसाद उमटतील, भाजपलाही रस्त्यावर उतरावे लागेल.
ज्या पक्षाचे खासदार, आमदार जास्त, त्याचाच पक्ष असा नियम आहे. निवडणूक आयोग नियमानुसारच काम करेल. ज्याकडे आमदार, खासदार जास्त पक्ष त्याचाच असतो. अजित पवार गटाकडे आमदार जास्त असतील. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ठोस काही पुरावे असतील. त्यामुळेच त्यांनी काही ठोस वक्तव्य केले असेल. मात्र, योग्य तो निर्णय निवडणूक आयोग घेईल, असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा